रविवार, २५ ऑक्टोबर, २०२०

कुरआनचा काही अंश

 काही chapters   

75 अल कियामह 

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व  कृपाळू आहे.
1 मी पुनरुत्थानाच्या दिवसाला साक्षी ठेवून सांगतो. 2 तसेच (मानवाचे ) मन , जे (वाईट कामांविषयी ) त्याला दोष देत असते, त्यास साक्ष ठेवून सांगतो. 3 मानवाला असे वाटते कि काय, आम्ही त्याची हाडे पुन्हा एकत्र करून त्याचे (पुनरुत्थान ) करू शकत नाही ? 4 अर्थातच, आम्हाला त्याच्या बोटांची पेर अन पेर (जशाचे तसे) बसवण्याचे सामर्थ्य प्राप्त आहे. 5 पण माणूस त्याच्यापुढे, जे येणार आहे त्यास नाकारू इच्छितो (म्हणजेच पुनरुत्थानास, कारण त्याला निर्भयपणे दुष्कृत्ये करता यावीत ). 6 (चेष्टा करत) तो विचारतो, ' तो पुनरूत्थानाचा दिवस येणार तरी केव्हा ? 7 जेव्हा (दहशतीने) डोळे दिपून जातील. 8 आणि चंद्राला ग्रहण लागेल. 9 जेव्हा सूर्य व चंद्र एकत्र आणले जातील.10 त्या दिवशी मनुष्य म्हणेल, ' आता कुठे पळून जाऊ ?' 11 नाही, ( हे मानवा !) तुझ्यासाठी आता कुठेही आश्रय नाही! 12 त्या दिवशी केवळ तुझ्या पालनकर्त्यापाशीच आश्रयस्थान आहे ! 13 त्या दिवशी मनुष्यासमोर त्याने जे काही आपल्यापुढे पाठविलेले असेल , आणि जे काही मागे सोडलेले असेल , ते सर्व उघड केले जाईल. 14 वस्तुस्थिती ही आहे की, मनुष्य स्वतः आपल्याविरुद्ध साक्ष आहे.15 मग तो कितीका सबबी पुढे ठेवत नाही ?
16 ( पैगंबर !) तुम्ही (हे कुराण) तुम्हाला लवकर पाठ होऊन जावे म्हणून घाईघाईने आपल्या जिभेला चालना देऊन नका. 17 कारण त्यास (तुमच्या मनात) संकलित करण्याची व पठण करवण्याची जबाबदारी निश्चितपणे आमच्यावर आहे. 18 जेव्हा आम्ही तुम्हाला वाचून ऐकवू, तेव्हा तुम्ही त्याच्या शब्दांचे लक्षपूर्वक अनुसरण करा. 19 त्याचे अर्थ स्पष्ट करणे आमचेच काम आहे.
20  नाही , पण तुमच्यापैकी (अनेकांना) ताबडतोब होणार फायदाच प्रिय असतो (म्हणजेच याच जगात सर्व काही मिळावे.) 21 आणि यानंतरच्या जीवनाकडे दुर्लक्ष करता. 22 काही चेहरे त्या दिवशी प्रफुल्लित असतील. 23 आपल्या पालनकर्त्याकडे पाहत असतील. 24 आणि त्या दिवशी काही चेहऱ्यांवर उदासीनता पसरलेली असेल. 25 या विचारात असतील की, त्यांच्यावर फार मोठं दुःखाचे संकट लवकरच कोसळणार आहे. 26 पण जेव्हा (मरणाऱ्या ) माणसाचा (शेवटचा श्वास) कंठाशी येतो. आणि (त्याच्या आसपासचे) लोक म्हणतात, ' कोणी मांत्रिक आहे का, जो त्याला वाचवू शकतो ? 28 आणि त्याला खात्री होते की, हीच या जगाला निरोप देण्याची वेळ आहे. 29 मृत्यू होताना होणाऱ्या तीव्र वेदनेमुळे, एक पाय दुसऱ्या पायावर घासू लागेल. (हे मानवा !) हा दिवस असेल तुझ्या पालनकर्त्याकडे प्रयाण करण्याचा !
31 (जोपर्यंत तो जिवंत होता) ना त्याने सत्याचा स्वीकार केला, ना त्याने नमाजरुपी प्रार्थना केली. 32 या उलट, त्याने सत्यास खोटे  ठरविले आणि त्याकडे पाठ दाखविली. 33 मग तो (उपदेशगृहातून) उठून मोठ्या ऐटीने आपल्या कुटुंबीयांकडे निघून जायचा. 34 (हे मानवा ! ) खेद आहे तुझ्याबद्दल , फक्त खेद ! 36 मनुष्याला असे वाटते की काय, त्यास (वाटेल ते करण्यासाठी) असेच सोडून देण्यात येईल ? (म्हणजे त्याच्याशी जाब विचारला जाणार नाही ?) 37 प्रथमतः तो गर्भाशयात टाकला गेलेला वीर्याचा एक बिंदू नव्हता का ? 38 वीर्यापासून पुढे तो गुठळी झाला, मग अल्लाहने त्यास घडविले व पूर्ण संतुलनासह त्याच्या अवयवांची रचना केली. 39 आणि त्याचे दोन प्रकार बनविले, म्हणजे नर व नारी. त्याचा (निर्माता असलेला अल्लाह) मृताला जिवंत करण्यास समर्थ नसेल का ? 

-----------------------------------------------------------------

chapter 61 अस-सफ्फ 

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 जे काही आकाशात आहे व जे काही पृथ्वीवर आहे, हे सर्व अल्लाहचेच स्तुतिगान करीत असतात, तोच सर्वांवर नियंत्रण ठेवणारा आहे, अस्सल बुद्धीवान आहे. 2 श्रद्धावंतांनो ! तुम्ही बोलता एक आणि करता दुसरेच असे का ? (तुम्ही आपल्या आचार व विचारात फरक का करता ?) 3 अल्लाहच्या नजरेत तुमचे असे कृत्य अत्यंत अप्रिय आहे की , बोलायचे एक आणि करायचे दुसरेच. 4 अल्लाहला तर ते लोक प्रिय आहेत. जे त्याच्या कार्यासाठी पंक्तिबद्ध  होऊन लढतात, जणू ते सर्व एक मजबूत अशी भिंत आहेत. 
5 (आणि ती वेळ आठवा) जेव्हा मुसाने आपल्या लोकांना म्हटले, 'माझ्या बांधवांनो ! तुम्ही मला त्रास का देता, जेव्हा तुम्ही हे जाणून आहात की, मी तुमच्याकडे पाठविण्यात आलेला पैगंबर आहे ; मग जेव्हा त्यांनी सन्मार्गापासून दूर जाणे पसंत केले. तेव्हा अल्लाहनेही त्यांच्या हृदयांना सत्यापासून दूर करून टाकले. कारण अल्लाह आज्ञाभंग करणाऱ्या लोकांना सन्मार्ग दाखवीत नसतो.
6 (असेच तेव्हाही घडले) जेव्हा मरियमपुत्र येशू मसीहने म्हटले, 'इस्राईलच्या मुलांनो ! मी तुमच्याकडे अल्लाहकडून पाठविलेला पैगंबर आहे;  माझ्यापूर्वीच्या तौरात या ग्रंथांपैकी जे सत्य बाकी राहिलेले आहे, त्यास प्रमाणित करणारा (मी) आहे. तसेच तुम्हाला एका पैगंबराविषयी शुभवार्ता देतो आहे, जो माझ्यानंतर येईल. ज्याचे नाव अहमद असेल.' आणि जेव्हा तो त्यांच्याकडे सत्याचे सर्व स्पष्ट प्रमाण घेऊन आला, तेव्हा ते म्हणाले, 'ही केवळ जादू आहे.' 7 आणि त्याच्यापेक्षा अधिक दुष्ट माणूस कोण असू शकतो, ज्याला, अल्लाहला समर्पित अशी जीवनपद्धती (म्हणजेच इस्लाम) कडे येण्याचे आवाहन केले जात असतानाही, तो अल्लाहविषयी खोट्या गोष्टी रचत असतो. पण अल्लाह अत्याचारी लोकांना सन्मार्ग दाखवीत नसतो. 8 जे आपल्या तोंडाच्या फुंकरेने अल्लाहचा प्रकाश विझवून टाकू इच्छितात. पण अल्लाह आपला प्रकाश पूर्णपणे सर्वत्र पसरविल्याशिवाय राहणार नाही. मग सत्य नाकारणाऱ्यांना याबद्दल कितीका वाईट वाटेना. 9 त्यानेच आपल्या पैगंबराला मार्गदर्शन आणि सत्यधर्म यांच्यासह पाठविले आहे, या उद्देशाने की, सत्यधर्माला इतर सर्व धर्मांवर (वैचारिक) प्रभुत्व करून द्यावे, मग ते अनेकेश्वरवाद्यांना कितीका अप्रिय वाटत नाही. 
10 (पैगंबर ! लोकांना सांगा,) श्रद्धावंतांनो ! मी तुम्हाला अशा फायद्याच्या सौद्याविषयी मार्गदर्शन करू का, जो तुम्हाला दुःखदायी शिक्षेपासून वाचवू शकतो ? 11 (तो हा की,) तुम्ही अल्लाह व त्याच्या पैगंबरावर विश्वास ठेवणारे बना आणि अल्लाहच्या मार्गात आपले धन व प्राण यांच्यासह प्रयत्नांची पराकाष्ठा (म्हणजेच जिहाद) करा. तुम्हाला हे समजत असेल , तर यात तुमचे (निश्चितपणे) भले आहे. 12 (तुम्ही असे केल्यास) अल्लाह तुमच्या चुका माफ करून टाकेल. आणि तुम्हाला अशा बागांमध्ये प्रवेश देईल. ज्यातून पाण्याचे (नयनरम्य) प्रवाह (नेहमी) वाहत असतील. तसेच राहण्यासाठी सुंदर घरे तो देईल, जे (घरे) शाश्वत  व सुखदायी बागांमध्ये असतील. हेच सर्वश्रेष्ठ यश आहे. 13 (त्या सर्वांसह) तुमच्यावर (या जगातही) आणखी एक कृपा तो करेल, ज्याची तुम्ही अभिलाषा बाळगून आहात.- अल्लाहकडून मिळणारे साहाय्य आणि लवकरच विजयाची प्राप्ती. (पैगंबर ! याविषयी ) श्रद्धावंतांना शुभवार्ता देऊन टाका.
14 श्रद्धावंतांनो ! तुम्ही (त्याप्रमाणे) अल्लाहची मदत करणारे बना, ज्याप्रमाणे मरियमपुत्र येशू मसीहने आपल्या अनुयायांना म्हटले होते,' अल्लाहकडे (लोकांना  बोलावण्याच्या) कार्यात कोण माझी मदत करेल?' त्याच्या अनुयायांनी उत्तर दिले होते, ' आम्ही अल्लाहची मदत करण्यासाठी तयार आहोत.' तेव्हा इस्राईलच्या मुलांपैकी (म्हणजे ज्यू लोकांपैकी) काहींनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि काहींनी नकार दिला. मग आम्ही श्रद्धा धारण केलेल्या लोकांची त्याच्या शत्रूंच्या विरुद्ध मदत केली, परिणामी ते विजयी झाले.

-----------------------------------------------------------------

chapter 62 अल - जुमुआ

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 जे काही आकाशात आहे आणि जे काही पृथ्वीवर आहे, ते सर्व अल्लाहचे स्तुतीगान करीत असतात. तो अस्सल सम्राट आहे, सर्व उणिवांपासून मुक्त असा, सर्वशक्तिमान आहे, बुद्धिमान आहे. 2 त्यानेच निरक्षर (उम्मी) लोकांमध्ये त्यांच्यामधूनच एक पैगंबर उभा केला, जो त्यांना त्याचे  (म्हणजे अल्लाहचे) संदेश ऐकवीत असतो. आणि (मानसिकदृष्टया) त्यांचे शुद्धीकरण करतो. आणि त्यांना  ग्रंथ व शहाणपणाचे धडे देत असतो. ते या यापूर्वी स्पष्टरित्या वाट चुकलेले होते. 3 (मक्केतील निरक्षरांव्यतिरिक्त) इतर लोकांकडेही (हा संदेश पोचविण्याची त्याच्यावर जबाबदारी आहे), ते लोक ज्यांचा (या मक्कावासीयांशी) अद्याप संबंध आलेला नाही. तोच सर्वशक्तिमान आहे आणि अस्सल बुद्धिवान आहे. 4 ही (पैगंबरी) अल्लाहची कृपा होय, तो इच्छितो त्यास, ती प्रदान करतो. अल्लाह असीम कृपावंत आहे.
5 ज्या लोकांच्या (शिरावर) तौरात (या अल्लाहच्या) ग्रंथाची जबाबदारी सोपवण्यात आली होती , पण त्यांनी ती जबाबदारी (गंभीरतापूर्वक) पेलली नाही. त्यांची तुलना त्या गाढवाशी केली जाऊ शकते, जो पुस्तकांचे ओझे वाहून नेत आहे. (खरोखर,) किती वाईट उपमा आहे, त्या लोकांसाठी ज्यांनी अल्लाहच्या संदेशांना खोटे ठरविले (त्याकडे वाईटरित्या दुर्लक्ष केले) ! अल्लाह अशा अत्याचारी लोकांना सन्मार्ग दाखवत नसतो. 6 (पैगंबर ! ज्यू लोकांना) सांगा, 'हे ज्यू लोकांनो ! तुम्हाला वाटत असेल की , तुम्ही इतरांपेक्षा अल्लाहला सर्वाधिक प्रिय आहात , आणि तुमच्या या वाटण्यात काही सत्यता असेल तर तुम्ही (लवकरात लवकर) मरण्याची अभिलाषा बाळगायला हवी. 7 ' पण (पैगंबर !) त्यांच्या हातांनी जी (दुष्) कृत्ये आपल्या पुढे पाठवलेली आहेत , त्या कारणामुळे ते कधीही अशी अभिलाषा बाळगणार नाहीत. अल्लाह अपराध्यांना चांगले ओळखून आहे. 8 त्यांना सांगा,' ज्या मृत्यूपासून तुम्ही दूर पळत आहेत, तो तुमच्यावर अटळरित्या येणार आहे. तेव्हा तुम्हाला त्या (अल्लाह) समोर हजार केले जाईल, जो ते सर्व जाणतो जिथपर्यंत कोणाचीही बुद्धी पोचू शकत नाही आणि तेही, जे सर्व जाणतात. तेव्हा तो तुम्हाला त्या कामांशी अवगत करेल , जी तुम्ही करीत होता.'
9 इमानधारकांनो ! जेव्हा तुम्हाला (साप्ताहिक प्रार्थनेकरिता) जमा होण्याच्या दिवशी (म्हणजे शुक्रवारी) नमाजासाठी  येण्याचे आवाहन केले जाईल, तेव्हा अल्लाहचे (नमाजरुपी) स्मरण करण्यासाठी सर्व खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद करून (प्रार्थनागृहाकडे) निघा. तुम्हाला हे समजणार असेल, तर यात तुमचे स्वतःचे भले आहे. 10 मग जेव्हा नमाज पूर्ण होईल, तेव्हा अल्लाहच्या कृपेच्या शोधार्थ (त्याच्या जमिनीवर) (पाहिजे तिकडे) पसरून जा. पण अल्लाहची प्रत्येक प्रसंगी आठवण करीत राहा. यासाठी कि, तुम्ही यशस्वी व्हावे.
11 (पण पैगंबर !) (काही लोकांच्या बाबतीत घटते मात्र याच्या उलट ) जेव्हा त्यांना काही खरेदी-विक्रीचा प्रकार किंवा करमणुकीचा प्रकार होत असल्याचे आढळते तर तुम्ही (प्रवचन करीत असताना) तुम्हाला उभे सोडून त्याकडे पळत सुटतात. त्यांना सांगा, 'जे अल्लाहपाशी आहे, ते कोणत्याही खरेदी-विक्रीच्या वस्तूपेक्षा व करमणुकीपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि अल्लाह सर्वोत्कृष्ट उपजीविका प्रदान करणारा आहे.'
-----------------------------------------------------------------

chapter 63 अल -मुनाफिकून 

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 (पैगंबर !) जेव्हा दांभिक लोक तुमच्याकडे येतात, तेव्हा ते म्हणतात, 'आम्ही अशी साक्ष देतो की, तुम्ही निःसंदेह अल्लाहचे पैगंबर आहात.' अल्लाह जाणतो की, तुम्ही निःसंदेह त्याचे पैगंबर आहात. आणि अल्लाह या गोष्टीची साक्ष देतो की , हे दांभिक खोटे बोलणारे आहे. 2 त्यांनी (खोटे बोलण्याचा उद्योग करण्यासाठी) आपल्या शपथांना ढाल बनविलेले आहे. आणि ते (त्याद्वारे) लोकांना अल्लाहच्या मार्गापासून परावृत्त करीत असतात. जे ते करीत आहे, खरोखर फार वाईट आहे.  3 (ते दांभिक) अशाप्रकारे बनले की , त्यांनी सुरुवातीला (वरवर ) श्राद्ध धारण केली , पण (मनोमनी) ते सत्य नाकारतात (व ते त्यांच्या कृत्यांतूनही दिसून येते), (परिणामी अल्लाहने ) त्यांची मने (सत्याच्या प्रवेशासाठी) सीलबंद करून टाकली. आता त्यांना सत्य उमजतच नाही. 
4 आता जेव्हा तुम्ही त्यांना पाहता, त्यांचे दर्शनी रूप तुम्हाला चांगले वाटू शकते. आणि जेव्हा ते बोलतात, तेव्हा तुम्ही त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकता. (पण ते तुमच्यासमोर असे बसतात) जणू भिंतीला टेकवून उभे केलेले लाकडाचे ओंडके आहेत , प्रत्येक जोराची आवाज त्यांच्याचविरुद्ध (काहीतरी) असल्याचे त्यांना वाटते. हे (धर्माचे खरे)शत्रू आहेत, तर यांच्यापासून (नेहमी) सावध राहा. त्यांच्यावर अल्लाहचा प्रकोप होवो ! ते कुठे भलतीकडे जात आहेत ! 5 कारण जेव्हा त्यांना म्हटले जाते, 'या, पैगंबर तुमच्यासाठी अल्लाहकडे क्षमायाचना करेल.' तेव्हा ते (नकार दर्शवीत) आपली डोकी हालवतात. आणि तुम्ही त्यांना पाहाल, मगरूरीचे प्रदर्शन करीत तिथून निघून जातात. 6  तुम्ही त्यांच्यासाठी (अल्लाहकडे) क्षमायाचना करा किंवा करू नका, दोन्ही गोष्ट सारख्या आहेत. (कारण परिणाम शून्यच असेल). अल्लाह त्यांना कदापि क्षमा करणार नाही. कारण अल्लाह विद्रोही लोकांना सन्मार्ग दाखवत नसतो.
7 हेच ते आहेत, जे (आपल्या साथीदारांना) म्हणतात, 'जे लोक अल्लाहच्या पैगंबरांसोबत आहेत, त्या लोकांवर (आपले धन) खर्च करू नका, (परिणामी) त्यांची गोची होऊन ते (पैगंबराची) साथ सोडून देतील.'  पण या दांभिक लोकांना हे माहीत  नाही की, आकाश व पृथ्वीचे सर्व खजिने, अल्लाहच्या मालकीचे आहेत. 8 आणि ते म्हणतात,' आम्ही मदिनेला परतल्यानंतर, (आम्ही) तेथील सर्वाधिक सन्माननीय लोक, तेथून त्या सर्वात तुच्छ अशा लोकांना निश्चितपणे हाकलून लावू.' पण या दांभिक लोकांना या गोष्टीची जाण नाही की, सर्व प्रकारचे मन-सन्मान अल्लाहसाठी  आहे, त्याच्या पैगंबरासाठी आहे व श्रद्धावंतांसाठी आहे. 
9 श्रद्धावंतांनो ! तुमची धनसंपत्तीं व तुमची मुले तुम्हाला अल्लाहच्या आठवणीपासून ढळण्यास कारणीभूत ठरायला नको. आणि ज्याला या गोष्टी (अल्लाहच्या स्मरणापासून विचलित करतील) तर असेच लोक (शेवटी) नाश पावणारे असतींल. 10 आणि तुम्हाला जे काही दिलेले आहे, त्यातून तुमच्यापैकी एखाद्याला मृत्यू येण्यापूर्वी त्याने खर्च करावे. मग तो म्हणू लागेल, ' हे माझ्या पालनकर्त्या ! तू मला आणखी काही काळ उसंत का नाही दिलीस? की , मी दानकार्य केले असते आणि सदाचारी लोकांपैकी झालो असतो.' 11 पण अल्लाह कोणालाही त्याची नियत वेळ येऊन ठेपल्यावर उसंत देत नसतो. आणि तुम्ही जे काही करता, अल्लाह त सर्व जाणतो. 
-----------------------------------------------------------------

chapter 64 अत तगाबुन

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 जे काही आकाशात आणि जे काही पृथ्वीवर आहे, ते सर्व अल्लाहचे स्तुतिगान करीत असतात. सर्वत्र त्याचीच सत्ता आहे व सर्वत्र त्याचीच स्तुती आहे. आणि सर्व वस्तुमात्रांवर त्यालाच पूर्ण 
नियंत्रण प्राप्त आहे. 2 त्यानेच तुम्हा (सर्वांना) निर्माण केले, मग तुमच्यात काही सत्य 
नाकारणारे तर काही सत्य स्वीकारणारे 
(श्रद्धावंत) आहेत. तुम्ही जे काही करता, त्यावर अल्लाह (नेहमी) नजर ठेवून असतो. 3 त्यानेच आकाश व पृथ्वी यांना उचित उद्देशासहित 
निर्माण केलेले आहे. आणि त्याने तुम्हाला 
आकार दिला, उत्तम आकार दिला. आणि त्याच्याकडेच तुम्हा सर्वांना परत जायचे आहे. 
4 जे काही आकाशात आहे व जे काही पृथ्वीवर आहे, ते सर्व तो जाणतो. तसेच तो तुम्ही जे 
लपवता व जे प्रकट करता तेही जाणतो. कारण 
अल्लाहलाच (लोकांच्या) मनात काय काय आहे, याचे पूर्ण ज्ञान आहे. 5 तुम्हाला त्या लोकांची जाणीव झाली नाही का, ज्यांनी यापूर्वी सत्य नाकारण्याचे (अपकृत्य) केले ? मग आपल्या कर्मांची फळे चाखली . आणि (यानंतरच्या जीवनात) तर त्यांच्यासाठी (याहूनही) कठोर 
शिक्षा आहे. 6 असे (पुन्हा-पुन्हा) यासाठी 
(घडले), कारण त्यांच्याकडे त्यांचे पैगंबर सत्याचे सर्व स्पष्ट प्रमाण घेऊन आले. पण  (पैगंबराप्रतिनेहमी) त्यांचा प्रतिसाद असाच होता की, ही (आमच्यासारखी असलेली) माणसे आम्हाला मार्दर्शन करणार आहेत ? अशाप्रकारे त्यांनी सत्यास नकार दिला आणि त्याकडे  
पाठ फिरवली. आणि अल्लाहला अशा लोकांची गरज नाही. तो (खराखुरा) आत्मनिर्भर आहे. सर्व प्रकारच्या स्तुतीस (सदैव) पात्र असा 7 सत्य नाकारणारे असा दावा करतात की, त्यांना पुन्हा जिवंत करून उठविले जाणे शक्यच नाही.
(पैगंबर!) त्यांना सांगा, ' माझ्या पालनकर्त्याची शपथ, तुम्हाला पुन्हा जिवंत करून 
अवश्य उठविलेजाईल, मग तुम्हाला तुम्ही जे जे करत होता, त्याचे दर्शन घडविले जाईल. ही अल्लाहसाठी अगदी सोपी गोष्ट आहे. 8 म्हणून (लोकांनो!) अल्लाहवर व त्याच्या पैगंबरावर 
आणि जो सन्मार्ग दाखवणारा प्रकाश 
आम्ही प्रकट केला आहे. त्यावर विश्वास 
ठेवणारे बना. आणि तुम्ही जे काही करता, त्याची अल्लाहला पूर्ण जाणीव आहे.   
9 जेव्हा तो तुम्हाला त्या एकत्र करण्याच्या 
दिवशी एकत्रित करेल. हाचदिवस (खऱ्याअर्थाने) जय व पराजयाचा दिवस असेल. 
जो कोणी श्रद्धा धारण करून सत्कर्मे केलेला 
असेल, अल्लाह अशा माणसाची वाईट कृत्ये 
माफ करून टाकेल.आणि त्यास अशा बागांत 
प्रवेश देईल, जिथे पाण्याचे (नयनरम्य) प्रवाह (नेहमी) वाहत असतील(असे लोक) तिथे 
कायम वास्तव्य करतील. हेच आहे अस्सल यश. 
10 ज्या लोकांनी सत्य स्वीकारण्यास नकार दिला 
आणि आमच्या संदेशांना खोटे ठरविले, 
असेच लोकनरकवासी असतील. ते तिथे 
कायम वास्तव्य करतील. हेच सर्वात 
वाईट ठिकाण आहे (राहण्याचे !)
11 (लोकांनो!) तुमच्यावर कोणतीही आपत्ती 
अल्लाहच्या परवानगीशिवाय येऊ शकत नाही. 
आणि जो कोणी अल्लाहवर दृढ विश्वास ठेवतो, 
अल्लाह त्याच्या अंतःकरणास योग्य मार्ग 
दाखवतो. अल्लाहला प्रत्येक गोष्टीचे 
परिपूर्ण ज्ञान आहे. 12 तुम्ही अल्लाहचे 
आज्ञापालन करा व पैगंबराचे 
आज्ञापालन करा. मग जर तुम्ही (या संदेशाकडे) दुर्लक्ष कराल तर आमच्या 
पैगंबरावर(संदेश) स्पष्टपणे पोहोचविण्यापलीकडे 
अन्य जबाबदारी नाही. 
13 अल्लाह त्याच्याशिवाय दुसरा कोणीच
उपासनेयोग्य नाही. आणि विश्वास 
ठेवणाऱ्यांना त्याच्यावरच विश्वास ठेवायला हवा.
14श्रद्धावंतांनो! तुमच्या पत्नी व तुमची मुले 
यांच्यापैकी काही (धर्माच्या बाबतीत) 
तुमचे शत्रू आहेत. तरतुम्ही त्यांच्यापासून 
सावध राहा. पण जर तुम्ही त्यांच्या 
चुकांकडे दुर्लक्ष कराल  आणि 
त्यांच्याप्रति दया दाखवाल व त्यांना माफ 
कराल, तर अल्लाह (देखील) फार क्षमा करणारा व दया करणारा आहे.15 (लोकांनो!) तुमची धनसंपत्ती व तुमची 
अपत्ये या गोष्टी तुमची कसोटी 
पाहण्याचे साधन आहे आणि (माणसाला जे जे हवे, ते खऱ्या अर्थाने) अल्लाहकडेच प्राप्त 
होणार आहे. 16 तर (श्रद्धावंतांनो!) नेहमी 
अल्लाहचा जाण  ठेवून (जीवन व्यतीत 
करण्यासाठी) प्रयत्नशील राहा. (जे सांगितले जाते ते) ऐका व आग्येचे 
पालन करा. व (त्याच्या कार्यासाठी) खर्च करा. 
यात तुमचे स्वतःचे भले आहे. जे लोक 
कृपनतेच्या (लालसेच्या) आहारी जाण्यापासून 
सुरक्षित राहिले. तर असेच लोक यशस्वी 
ठरणारे आहेत. 17 जर तुम्ही अल्लाहला उदारतापूर्ण कर्ज द्याल तर तो त्यात तुमच्यासाठी कित्येक पटीने वाढ करेल.आणि तो तुमच्या 
चुका माफ करेल. कारण अल्लाह  हा (आपल्या दासांप्रति) फार गुणग्राहक आहे व फार 
सहिष्णू आहे.18तो ते सर्व जाणतो, जिथपर्यंत कोणाचीही बुद्धी पोचू शकत नाही आणि तेही, जे सर्व 
जाणतात. तोच सर्वशक्तीमान व खरा  बुद्धिवान आहे.

-----------------------------------------------------------------

chapter 65 अत - तलाक

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.1 पैगंबर !  जेव्हा तुमच्यापैकी कोणीही आपल्या पत्नींना घटस्फोट (तलाक) देईल तर (त्याने ) त्यांना त्यांच्या स्वच्छतेच्या (म्हणजे मासिक पाळी नसलेल्या) काळात तलाक द्यावा. आणि त्या काळाची गणना काळजीपूर्वक करा. आणि आपला पालनकर्ता असलेल्या अल्लाहसमोर (जाब देण्याची सदैव) जाण  ठेवा. (तलाकची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत) त्यांना त्यांच्या घरातून काढू नका. तसेच त्यांनीही घर सोडून जाऊ नये. पण फक्त त्यांनी जर उघड-उघड काही निर्लज्जपणाचे कृत्य केलेले असेल (तर त्यांना घराबाहेर घालवू शकता). या अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादा आहेत आणि जो कोणी अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादा भंग करेल, तर तो स्वतःवरच अन्याय करणारा आहे. 
(हे माणसा !) तू जाणत नाहीस की, अल्लाह त्यानंतर कदाचित काही नवीन (कल्याणकारी ) स्थिती निर्माण करेल. 2 मग त्यांच्या प्रतीक्षेची मुदत पूर्ण झाल्यांनंतर, त्यांना सन्मानाने ठेवून घ्या किंवा सन्मानाने सोडून द्या. आणि आपल्या 
(नातेवाईकांपैकी) दोन विश्वसनीय लोकांना साक्ष म्हणून बोलावून घ्या. (आणि साक्ष देणाऱ्यांनी गरज असेल तेव्हा) अल्लाहची जाण ठेवून, योग्य तीच साक्ष द्यावी. हे उपदेश त्या माणसाला दिले जात आहेत, जो अल्लाहवर व न्यायाच्या दिवसावर विश्वास ठेवणारा आहे. आणि जो कोणी अल्लाहकडे (जाब देण्याची) जाण ठेवेल, अल्लाह त्याच्यासाठी (अडचणीतून) बाहेर पाडण्याचा मार्ग काढेल. 3 आणि तो त्याला अशा ठिकाणाहून उपजीविका पुरवेल, ज्याची त्याने कधी कल्पनाही केलेली नसेल. जो कोणी अल्लाहवर विश्वास ठेवतो, अल्लाह त्याच्यासाठी पर्याप्त आहे. अल्लाह नेहमी आपली योजना तडीस नेतोच. (आणि) अल्लाहने प्रत्येक गोष्टीसाठी एक (अवधी व) प्रमाण ठरवून दिलेले आहे.4 आणि तुमच्या स्त्रियांपैकी वय झाल्यामुळे ज्यांना मासिक पाळी येण्याविषयी शंका आहे. तर अशा स्त्रियांसाठी प्रतिक्षेची अवधी तीन महिने आहे आणि हाच नियम त्यांनाही लागू होईल ज्यांना मासिक पाळी आलेलीच नाही. आणि गर्भवती असलेल्या स्त्रियांसाठी प्रतिक्षेचा काळ प्रसूती होईपर्यंत आहे. आणि जो कोणी अल्लाहकडे (जाब देण्याची) जाण ठेवेल, अल्लाह त्याचे काम सोपे करून टाकेल. हा आहे अल्लाहचा आदेश, जो त्याने तुमच्याकडे प्रकट केलेला आहे. जो कोणी अल्लाहची जाण बाळगून (जीवन जगेल), अल्लाह त्याच्या चुका माफ करून टाकेल आणि त्यास फार मोठे बक्षीस प्रदान करेल.6 ज्या स्त्रिया (प्रतिक्षेच्या काळात) आहेत. त्यांना आपल्या ऐपतीनुसार जसे तुम्ही राहत  आहात, तसेच त्यांनाही तिथेच राहू द्या. आणि त्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने त्यांचा छळ करू नका. आणि त्या जर गर्भवती असतील, तर बाळ जन्माला येईपर्यन्त खर्च करा. मग जर (तलाक झाल्यानंतरही) त्या तुमच्या (बाळाला) स्तनपान देत असतील, तर त्यांना त्याबद्दल योग्य तो मोबदला द्या. (मुलाच्या भविष्याविषयी) आपसात सामंजस्यपूर्वक विचारविमर्श करा. आणि जर तुम्ही आपसात असहमत असाल, तर मग इतर एखादी स्त्री तुमच्या बाळाला दूध पाजील. (या सर्व बाबतीत) ज्याच्याकडे मोठ्या प्रमाणात धनसंपत्ती आहे, त्याने त्यानुसार खर्च करावा. आणि ज्याच्याकडे निर्वाहाची साधने कमी प्रमाणात आहेत त्याने, अल्लाहने त्याला जे काही दिलेले आहे त्यानुसार त्यातून खर्च करावा. अल्लाहने ज्याला जितके दिलेले आहे, त्यापेक्षा अधिक भार तो कोणावरही टाकत नसतो. अल्लाह हलाखीच्या (दिवसांनंतर)लवकरच चांगले दिवसही आणेल. 8 कित्येक अशा वस्त्या होत्या, ज्यांनी आपल्या पालनकर्त्याच्या व त्याच्या पैगंबराच्या आग्यांचे उल्लंघन केले, तेव्हा आम्ही त्यांना कठोरपणे फैलावर घेतले. आणि आम्ही त्यांना कठोर शिक्षा केली. 9 अशाप्रकारे त्यांनी आपल्या (कर्मरूपी) कमाईची फळे चाखली आणि शेवटी विनाशाशिवाय त्यांच्या वाट्याला काहीच आले नाही. 10 (यापलीकडेही ) अल्लाहने त्यांच्यासाठी (याहूनही) मोठी शिक्षा तयार ठेवलेली आहे. हे बुद्धी बाळगणाऱ्या श्रद्धावंतांनो! अल्लाहची जाण बाळगून असा. अल्लाहने तुमच्याकडे एक बोधग्रंथ प्रकट केलेला आहे. 11 (आणि) एक पैगंबर (पाठविला आहे), जो तुम्हाला अल्लाहचे सुस्पष्ट संदेश  ऐकवीत आहे. यासाठी की, जे श्रद्धा धारण करून सत्कर्मे करीत आहेत, अशा लोकांना अंधकारातून काढून प्रकाशात आणावे. आणि जो कोणी अल्लाहवर श्रद्धा धारण करून सत्कर्मे करतो, तो त्यास अशा बागांत प्रवेश देईल, ज्यातून पाण्याचे   (नयनरम्य) प्रवाह (कायम) वाहत असतील. ते तिथे कायम वास्तव्य करतील. ही  अल्लाहने त्याला प्रदान केलेली उत्कृष्ट उपजीविका असेल. तो अल्लाह आहे, ज्याने सात आकाशांना निर्माण केले व तशाच पृथ्वी देखील. त्यांच्यामध्ये त्याचे आदेश प्रकट होत असतात (आणि त्या आदेशांनुसार हा प्रचंड कारखाना काम करीत असतो) ते यासाठी की, तुम्हाला कळून यावे की, प्रत्येक गोष्टीवर अल्लाहचे पूर्ण नियंत्रण आहे. आणि अल्लाहने आपल्या ज्ञानाने प्रत्येक गोष्टीस वेढून ठेवलेले आहे.
___________________________________

66  आत-तहरीम 

1 पैगंबर ! तुम्ही आपल्या पत्नींच्या  प्रसन्नतेखातर  त्या गोष्टीला (स्वतःसाठी) का अवैध ठरवता, जी अल्लाहने तुमच्यासाठी वैध ठरविलेली आहे. पण अल्लाह फार क्षमाशील व दयाळू आहे.
2 अल्लाहने तुम्हाला आपल्या शपथांमधून मुक्त होण्याचे (नियमासहित) आधीच बजावलेले आहे, कारण अल्लाह तुमचा साम्भाळकर्ता आहे. आणि तोच सर्व काही जाणणारा व बुद्धिमान आहे.
3 आणि (एकदा असे घडले की,) पैगंबराने आपल्या पत्नींपैकी एकीला एखादी गोपनीय गोष्ट सांगितली. पण तिने ती गोष्ट गुप्त ठेवली नाही. आणि अल्लाहने पैगंबराला याबद्दल सूचित केले. तेव्हा पैगंबराने तिला त्यांपैकी काही भाग सांगितला आणि काही भाग सांगायचे टाळले. मग जेव्हा पैगंबराने आपल्या पत्नीस हे सांगितले, (जे त्यास अल्लाहद्वारे कळविण्यात आले होते ), तेव्हा तिने विचारले,
' तुम्हाला याविषयी कोणी सांगितले?
पैगंबराने उत्तर दिले, ' मला त्याने हे सांगितले जो सर्व काही जाणणारा आहे व प्रत्येक गोष्टीविषयी जागरूक आहे. 4 (पैगंबराच्या पत्नींनो !) जर तुम्ही दोघी पश्चातापदग्ध होऊन अल्लाहकडे वळाल, तर (ते तुमच्या हिताचे असेल) (कारण) तुमची मने आधीच (जे योग्य आहे) त्यापासून दूर गेलेली आहेत. पण जर तुम्ही दोघी पैगंबराच्या विरुद्ध एकमेकींना मदत कराल, तर (लक्षात ठेवा) पैगंबरांचा साहाय्यकरता अल्लाह आहे आणि  जिब्रील (हा स्वर्गदूत) आणि सत्कृत्ये करणारे श्रद्धावंत आणि याव्यतिरिक्त (सर्व इतर) स्वर्गदूत त्याला साहाय्य करणारे आहेत. 5 (पैगंबराच्या पत्नींनो !) जर पैगंबराने तुम्हाला घटस्फोट दिला, 
तर त्याचा पालनकर्ता तुमच्याजागी तुमच्याहून अधिक चांगल्या पत्नी त्याला देऊ शकतो. ज्या, अल्लाहप्रति समर्पित अशा, श्रद्धावंत, आज्ञाधारक, नेहमी अल्लाहसमोर लीन असलेल्या, निष्ठावंत उपासक, उपवास करणाऱ्या, ज्या विधवा व कुमारिकाही असतील. 
6  श्रद्धावंतांनो  ! तुम्ही स्वतःला व तुमच्या कुटुंबियांना त्या (नरकाच्या) आगीपासून वाचवा जिचे इंधन माणसे व दगड असतील. जिचे (रखवालदार म्हणून ) कठोर व प्रचंड शक्तिशाली (अल्लाहचे ) दूत नियुक्त आहेत. अल्लाहने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या बाबतीत ते जराशीदेखील कुचराई करीत नाहीत. ते अगदी तेच करतात, जे करण्याचा त्यांना आदेश दिला जातो. 7 सत्य नाकारण्यावर आग्रही राहिलेल्या लोकांनो ! आज कोणत्याही सबबी प्रस्तुत करू नका. तुम्हाला त्याचाच मोबदला देण्यात येत आहे, जे तुम्ही करीत होता.
8 श्रद्धावंतांनो! प्रामाणिकपणे पश्चाताप करून अल्लाहकडे वळा, नवल नव्हे, तुमचा पालनकर्ता तुमची वाईट कृत्ये माफ करून टाकेल आणि तुम्हाला अशा बागांमध्ये प्रवेश देईल, ज्यांमधून पाण्याचे (नयनरम्य) प्रवाह (सदैव) वाहत असतील. त्या दिवशी (म्हणजे न्यायाच्या दिवशी), अल्लाह पैगंबरास व त्याचे अनुसरण करणाऱ्या श्रद्धावंतांना अपमानित करणार नाही. त्यांच्या (सद्गुणांचा) प्रकाश त्यांच्यासमोर व त्याच्या उजव्या बाजूस धावत असेल. आणि ते म्हणतील, ' हे प्रभू ! आमच्यासाठी आमच्या या प्रकाशास सदैव तळपत ठेव. आणि आम्हाला क्षमा कर. खरोखर, तुला प्रत्येक गोष्टीवर पूर्ण नियंत्रण प्राप्त आहे.'
9 पैगंबर ! (अल्लाहचे शत्रू असलेल्या) सत्य नाकारणाऱ्या लोकांशी व दांभिक लोकांशी जिहाद करा. आणि त्यांच्याप्रति दयामाया दाखवू नका. त्यांचे अंतिम स्थान नरक आहे आणि ते खरोखर फार वाईट स्थान आहे.
अल्लाह सत्य नाकारणाऱ्या लोकांसाठी नूहची पत्नी व लूतची पत्नी यांचे उदाहरण सादर करीत आहे. ज्या आमच्या दोन सदाचारी भक्तांशी विवाहबद्ध होत्या. मग त्यांनी त्यांच्याशी (म्हणजे आपल्या पतींशी) विश्वासघात केला. त्यामुळे (न्यायाच्या दिवशी) अल्लाहच्या मर्जीच्या विरुद्ध , ते त्यांच्या कोणत्याही प्रकारे कामी येऊ शकणार नाहीत. आणि त्या दोघींना सांगितले जाईल, ' नरकाच्या आगीत प्रवेश करा, इतर प्रवेश करणाऱ्यांबरोबर.'
11 आणि इमान धारण केलेल्या लोकांसाठी अल्लाह फिरऔनच्या पत्नीचे उदाहरण समोर ठेवत आहे. तिने ( अल्लाहशी प्रार्थना केली ) म्हणाली, ' हे प्रभू ! माझ्यासाठी स्वर्गात तुझ्या सान्निध्यात एक घर बनव, आणि मला फिरऔन व त्याच्या कुकृत्यांपासून वाचव  आणि मला अत्याचारी लोकांपासून मुक्ती दे.' असेच (दुसरे उदाहरण) इमरानची मुलगी मरियम  हिचे आहे, जिने आपले शील सुरक्षित ठेवले. मग आम्ही तिच्यात आमचा आत्मा फुंकला. आणि तिने आपल्या पालनकर्त्याच्या वचनांचे व त्याच्या ग्रंथाचे (पूर्ण) समर्थन केले. आणि ती आज्ञाधारक (भक्तांपैकी) होती.

-----------------------------------------------------------------

67 अल - मुल्क

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत 
दयाळू व कृपाळू आहे.

1 असीम समृद्ध आहे तो, ज्याच्या हाती समस्त विश्वाची (ची) सत्ता आहे. प्रत्येक वस्तुमात्रावर त्याचेच नियंत्रण आहे. 2 त्यानेच तुमची कसोटी पाहण्यासाठी जीवन व मृत्यू निर्माण केले. तुमच्यापैकी कोण चांगली कामे करतो, 
(हे त्याला पाहायचे आहे). तो सर्वशक्तिमान (असूनही) फार क्षमाशील आहे. 3 ज्याने 
एकावर एक असे सात आकाश निर्माण  केले. कृपावंत (अल्लाहच्या) निर्मितीमध्ये तुम्हाला कोणताही दोष असल्याचे आढळून येणार नाही. 
(एकदा पाहिल्याने दोष न आढळल्यास) पुन्हा एकदा पाहा, की, तुम्हाला आढळतो का 
कुठे काही दोष ? 4 मग आणखी पुन्हा पुन्हा 
पाहा, (प्रत्येक वेळेस) तुमच्या (दोष शोधणाऱ्या) 
नजरा थकून व निराश होऊन तुमच्याकडे परततील (पण अल्लाहच्या निर्मितीमध्ये दोष कुठेही 
आढळणार नाही).
5 आणि आम्ही पृथ्वीसाठी सर्वात जवळ असलेल्या आकाशाला दिव्यांनी सजवलेले आहे. आणि (वाईट हेतूने आपल्या मर्यादा ओलांडणाऱ्या) 
सैतानांना पिटाळून लावण्याचे त्यांना साधन 
बनविले आहे.आणि त्यांच्यासाठी धगधगत्या 
आगीची (भयंकर) शिक्षा तयार आहे. 
6  ज्या लोकांनी आपल्या पालनकर्त्याला 
मानण्यास नकार दिला त्यांच्यासाठी नरकाची (भयंकर) आग तयार ठेवलेली आहे. (खरोखर) ते फारच वाईट ठिकाण आहे. 
7 जेव्हा त्यांना तिच्यात टाकले जाईल, तेव्हा तिची (भयंकर) गर्जना ते ऐकतील आणि ती उसळी घेत असेल. 8 जणू तिच्या क्रोधाचा स्फोटच होत आहे. प्रत्येक समूह जेव्हा तिच्यात टाकला 
जाईल, तिचे रखवालदार (प्रत्येक समूहाला) 
विचारतील, ' तुमच्याकडे कोणी सावध 
करणारा आला नव्हता का ?' 9 ते उत्तर देतील, ' अर्थातच, सावध करणारा आमच्याकडे 
आला होता, पण आम्ही त्यास खोटे ठरविले होते 
आणि आम्ही त्यास म्हटले होते, 'अल्लाहने 
काहीही प्रकट वगैरे केलेले नाही.
' तुम्ही (स्वयंनियुक्त पैगंबर अल्लाह च्या 
संदेशा चे नाटक करून) चुकीच्या मार्गी 
लागलेले आहात ' 10  आणि ते म्हणतील, ' जर आम्ही त्यांचे म्हणणे ऐकले असते आणि        ( निदान) आमच्या बुद्धीचा वापर केला 
असता, तर आता आम्ही नरकवासीयांपैकी 
 झालो नसतो.' 11  आणि अशाप्रकारे ते 
आपल्या अपराधाची कबुली देतील.
तर नारकवासीयांवर सर्वप्रकारे अल्लाहची 
अवकृपा होवो!

12  (या उलट) जे लोक आपल्या 
पालनकर्त्याला  न पाहताही त्याच्याप्रति 
भीतीयुक्त आदर बाळगतात. त्यांना
(अल्लाहकडून) क्षमा व फार मोठे 
बक्षीस प्राप्त होईल.

13( लोकांनो!) तुम्ही काहीही गुपचुपरित्या बोला किंवा मोठ्याने बोला प्रत्येकाच्या मनात जे- जे आहे, ते सर्व त्याला माहीत आहे. 14 
ज्याने तुम्हाला निर्माण केले, त्यालाच ( तुमच्याविषयी) प्रत्येक गोष्ट माहीत नसणार का? 
त्याची बौद्धिक शक्ती अगाध आहे, ( कोणासाठीही) अनाकलनीय अशी आहे. 
तोच प्रत्येक गोष्टीची जाणीव असणारा आहे. 

15 त्यानेच पृथ्वीला तुमच्या अधीन करून टाकले. तर तुम्ही तिच्या भूभांगावर  संचार करा. आणि त्याने दिलेल्या उपजिविकेतून खा, आणि (हे नेहमी लक्षात ठेवा की, शेवटी) पुनरुत्थान 
होऊन त्याच्याकडेच परत जायचे आहे. 16
तुम्ही त्याच्यापासून स्वतःला सुरक्षित समजता
 का, जो आकाशात आहे. (म्हणजेच 
अल्लाहपासून ) ? की , तो तुम्हाला जमिनीत 
गाडून टाकू शकत नाही ? पाहा जेव्हा 
ती कंपित होते (तेव्हा काय होऊ शकते?) 
17  किंवा जो आकाशात आहे,
त्याच्यापासून तुम्ही निर्भय झाला आहेत 
का ? की, तो तुमच्यावर दगडांचा 
वर्षाव करणारे तुफानी वादळ पाठवू
शकत नाही? पण तेव्हाच तुम्हाला 
कळून चुकेल की , किती (खरा) होता माझा 
इशारा. 18 आणि त्यांच्या पूर्वीच्या अनेकांनी (माझ्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून त्यास) 
खोटे ठरविले. तर कशी होती माझी नाराजी (जी त्यांच्यावर प्रकट झाली )!

19 ते त्यांच्यावर उडणाऱ्या पक्ष्यांचे कधी (चिंतनपूर्वक ) अवलोकन कारण नाहीत का, 
जे आपले पंख पसरवितात आणि (गरजेनुसार) ते आत मिटून घेत असतात. त्यांना 
थांबवून ठेवणारा कृपावंत (अल्लाहशिवाय)
दुसरा कोणीच नाही. कारण तो सर्व गोष्टींवर नजर ठेवून असतो. 20  अशी कोणती सेना आहे, जी कृपावंत अल्लाहच्या विरुद्ध तुम्हाला 
साहाय्य करू शकेल? सत्य नाकारणारे 
केवळ स्वतःची फसवणूक करीत आहेत ! 21 (अशाप्रकारे) अल्लाहने तुम्हाला उपजीविका 
प्रदान करणे बंद केले, तर (त्याच्याशिवाय) दुसरा कोण आहे जो 
तुम्हाला उपजीविका देऊ शकतो ? (हे सत्य उघड असतानाही,) हे केवळ हट्टापोटी 
विद्रोहाची आणि सत्यापासून दूर जाण्याची भूमिका घेत आहेत.

22 जो माणूस आपल्या चाऱ्यावर लोटांगण घालून चालतो, तो सन्मार्गावर असू  शकतो की, जो सरळ मार्गावर, सरळ ताठ मान ठेवून चालतो तो? 
23 त्यांना सांगा, 'तोच आहे (अल्लाह) 
ज्याने तुम्हा सर्वांना निर्माण केले आणि 
तुमच्यासाठी कान, डोळे व हृदये बनविली, पण 
(अल्लाहप्रति) फारच थोडी कृतज्ञता
दाखवता.' 24  त्यांना सांगा कि, तोच आहे (अल्लाह) ज्याने तुम्हाला पृथ्वीवर सर्वत्र पसरवून टाकले. आणि शेवटी (पुनरुत्थानाच्या दिवशी) 
तुम्हाला त्याच्याकडेच एकत्रित आणले जाणार 
आहे.

25  पण ते विचारतात, ' या (पुनरुत्थानाच्या) 
वचनाची पूर्तता होणार तरी केव्हा? तुमच्या 
म्हणण्यात काही सत्य असेल, तर (आम्हाला उत्तर द्या). ' 26 (पैगंबर !) त्यांना सांगा, ' याचे ज्ञान केवळ अल्लाहला आहे आणि मी तर 
फक्त त्यापासून स्पष्टरित्या सावध करणारा आहे.' 
27  पण जेव्हा ते वचन पूर्ण होण्यासाठी जवळ 
येत असल्याचे पाहतील, तेव्हा सत्य नाकारणाऱ्या लोकांचे चेहरे (दहशतीने) अगदी खिन्न 
होऊन जातील. आणि (तेव्हा) त्यांना 
सांगितले जाईल, ' हीच ती गोष्ट आहे, जिची (खिल्ली उडवत तिला आणण्याची) तुम्ही मागणी करीत असत.' 28 (पैगंबर !) त्यांना सांगा     '(या जगात) अल्लाह मला व माझ्याबरोबर 
असलेल्या लोकांना नष्ट करेल
 किंवा आमच्यावर दया करेल. पण (यानंतरच्या जगात) सत्य नाकारणाऱ्यांना त्या (कायमस्वरूपी) दुःखदायी  शिक्षेपासून कोण 
वाचवू शकतो? याविषयी तुम्ही कधी विचार 
केलात का ?' 29 त्यांना सांगा, ' तो कृपावंत अल्लाह आहे, आम्ही त्याच्यावरच 
श्रद्धा ठेवतो व त्याच्यावरच भरवसा ठेवतो. आणि 
तुम्हाला लवकरच कळून चुकेल की , कोण 
उघडउघड वाट चुकलेला आहे.' 30 ( सत्य नाकारणाऱ्यांना) सांगा, ' तुम्ही यावर कधी विचार केला आहात का की, जर तुमचे सर्व पाण्याचे साठे जमिनीत अचानक 
लुप्त झाले तर (अल्लाहशिवाय दुसरा) कोण आहे, जो 
तुमच्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध करू  शकतो ?'

-----------------------------------------------------------------

चॅप्टर 109 अल काफ़िरून 

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 सांगा, ' हे सत्य नाकारणाऱ्या लोकांनो ! 2 मी त्यांची उपासना करीत नाही, ज्यांची उपासना तुम्ही करता. 3  तसेच तुम्ही त्याची उपासना करीत नाही, ज्याची उपासना मी करतो. 4 मी त्यांची कदापि उपासना कदापि करू शकत नाही, ज्यांची उपासना करू शकत नाही, ज्यांची उपासना तुम्ही करता. 5 तसेच ना तुम्ही त्याची उपासना कधी कराल, ज्याची उपासना मी करतो. 6 तुमचा धर्म तुम्हाला लखलाभ आणि माझा धर्म मला.' [ कुराण 109 : 1 - 6 ]
-----------------------------------------------------------------

चॅप्टर 112 अल इखलास 

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू  व कृपाळू आहे.
1 ( पैगंबर ! हे लोक अल्लाहविषयीं विचारतात ), तुम्ही त्यांना सांगा, 'अल्लाह एकच  आहे, 2 तो आत्मनिर्भर ( व स्वयंपूर्ण ) आहे. 3 ना तो कोणाला ( अपत्यरूपी )जन्म देतो. ना तो कोणापासून जन्माला आलेला आहे ( असा आहे अल्लाह ).4  आणि त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही.' [कुराण 112 :1 -4 ]
-----------------------------------------------------------------

चॅप्टर ११३ अल फ़लक 

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 ( पैगंबर !) सांगा, 'सकाळ निर्माण करणाऱ्या पालनकर्त्याचे मी शरण प्राप्त करू इच्छितो. 2 त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीच्या अपायापासून ( स्वतःला वाचविण्यासाठी ).3  आणि रात्रीच्या अपायापासून , जेव्हा ती सर्वत्र (अंधार ) पसरवते. 4 तसेच त्यांच्या अपायापासून जे काही गूढ प्रयास करून फुंकर मारतात. 5 तसेच मत्सर बाळगणारा जेव्हा मत्सर बाळगतो, त्याच्या अपायापासून वाचवण्यासाठी ( त्याचे शरण अवश्य आहे).' [कुराण 113 : 1 -5 ]
-----------------------------------------------------------------


चॅप्टर 114 अन नास 

* आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 (पैगंबर!) सांगा, 'मी लोंकाच्या पालनकर्त्याचे शरण प्राप्त करू इच्छितो, 2 जो लोकांचा सर्वाधिपती 3 (व) लोकांचा ईश्वर आहे, 4 जो लपून बहकाविण्याचे काम करतो अशा (सैतानाच्या) अपायापासून  (स्वतःला वाचविण्यासाठी मला त्याचे शरण हवे आहे.) 5 जो लोकांच्या मनात वाईट विचार भरतो, 6 मग तो जिन्नांपैकी असो वा  मनुष्यांपैकी.'  [कुराण 114 : 1 -6 ]
----------------------------------------------------------------


कुरआन

2 हा अल्लाहचा ग्रंथ आहे, यात मुळीच शंका नाही. मार्गदर्शन आहे अल्लाहची जाण  असणाऱ्यांसाठी. 3 जे श्रध्दा ठेवतात (मानवी आकलनापलीकडील) अदृश्यावर, आणि अढळपणे प्रार्थना करीत असतात, आणि जे काही आम्ही त्यांना दिले आहे, त्यातून (इतरांवर ) खर्च करीत असतात. 4 आणि  (पैगंबर!) जो ग्रंथ तुम्हाला प्रदान करण्यात आला व जे ग्रंथ तु मच्यापूर्वी ((इतर पैगंबरांना ) प्रदान करण्यात आले, सर्वांवर दृढ विश्वास ठेवतात आणि मरणोत्तर जीवनावरही आढळ श्रद्धा ठेवतात.5  हे लोक आपल्या प्लांकर्त्याने दाखवलेल्या सरळ मार्गावर आहे. हेच लोक यशस्वी होणार आहेत.[कुराण 2 :2 -5 ]

-------------------------------------------------

75 तर मी ताऱ्यांच्या स्थानांची शपथ घेऊन सांगतो. 76 जर तुम्ही चिंतन कराल तर ( कळून येईल ) ही खरोखर फारच मोठी शपथ आहे. 77 यात शंकाच नाही की , हे कुराण फार थोर ( असा ग्रंथ )आहे. 78 एका सुरक्षित ग्रंथात जतन करून ठेवलेला आहे. 79 त्यास तेच स्पर्श करतात. जे ( मनाने पवित्र) आहेत. 80 प्रकट करण्यात आलेला आहे सर्व जगांच्या मालकाकडून.     [कुराण 56 : 75 -79 ]

---------------------------------------------------

4 (पण ) पूर्वीच्या ग्रंथधारकांकडे स्पष्ट प्रमाण येऊन पोचल्यानंतरच त्यांच्यात फाटाफूट झाली.[कुराण 98:4 ]

-------------------------------------------------

23  अल्लाहने सर्वोत्तम संदेशग्रन्थ प्रकट केलेला आहे, ज्यातील संदेशवचने एकमेकास  (मिळतीजुळती व ) पूरक आहेत आणि पुन्हा-पुन्हा आलेली आहे. ( हे ऐकून किंवा वाचून ) त्या लोकांच्या अंगावर शहारे उभे राहतात, जे आपल्या पालनकर्त्याची जाण बाळगून आहे. मग त्यांचे तन व मन मृदू होऊन, अल्लाहच्या स्मरणासाठी प्रवृत्त होतात. हे कुराण अल्लाहचे मार्गदर्शन आहे. याद्वारे तो इच्छितो त्यास मार्गदर्शन प्रदान करतो ( अर्थातच सत्याचा शोधकाला ) आणि ज्याला अल्लाह मार्गभ्रष्ट करतो, त्यास कोणीही मार्गदर्शन करू शकत नाही. [कुराण 39 :23 ] 

----------------------------------------------

1 हा. मीम . 2  या सुबोध अशा ग्रंथाची शपथ. 3 आम्ही या (ग्रंथास) अरबी भाषेत (प्रकट केले आहे), म्हणजे तुम्हा लोकांना ( त्यातील संदेश ) ग्रहण करता यावे.

4 आणि या ( कुराणाचा ) मूळ स्रोत आमच्याकडे असलेल्या महाग्रंथात आहे. खरोखर हे उदात्त व ज्ञानाने परिपूर्ण आहे.          [कुराण 43 : 2 -4 ]

------------------------------------------------------

89 आम्ही या कुराणात लोकांसाठी, सर्व प्रकारची उदाहरणे विविध प्रकारे प्रस्तुत केलेली आहेत. तरीसुद्धा बहुसंख्य लोकांनी सत्य नाकारण्याचीच भूमिका आग्रहपूर्वक स्वीकारलेली आहे.
[कुराण 17 : 89]

-----------------------------------------------------

 

शबे कद्र

 chapter 97 अल-कद्र


* आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.

1 आम्ही या (कुराणाच्या ) प्रकटीकरणाची (सुरुवात) भाग्य निश्चित करण्याच्या रात्री केलेली आहे. 2 तुम्हाला काय माहीत, त्या रात्रीचे महत्त्व काय आहे ? 3 ती (एक) रात्र हजार महिन्यापेक्षा अधिक उत्तम आहे. 4  त्या रात्री (असंख्य) स्वर्गदूत व (प्रमुख स्वर्गदूतांपैकी एक असलेला जिब्राइल हा) स्वर्गदूत आपल्या पालनकर्त्याच्या परवानगीने प्रत्येक गोष्टीसंबंधाने त्याचे आदेश घेऊन (पृध्वीवर) उतरतात. 5 पहाट होईपर्यंत ती रात्र शांतता (व  सुरक्षिततेची) रात्र आहे.        [कुराण 97 : 1 -5 ]

शबे कद्र ची रात्र रमजान महिन्याच्या 21 ,23 ,25 ,27 ,29 या रात्री शोधली जाते. या रात्रीत जास्तीत जास्त प्रार्थना करतात.आणि क्षमा मागतात.आणि नरकाच्या आगीपासून संरक्षण मागतात.

मुख्य रात्र 27 रमजानची  "शबे कद्र" ची रात्र आहे, असे समजतात. पण ती वरील पाच पैकी कोणतीही रात्र असू शकते. रात्रभर कुराण वाचतात आणि दुआ ( प्रार्थना ) करतात आणि पहिला कलमा वारंवार म्हणतात, " ला इलाह इल्लल्लाह मोहम्मदूर रसूलल्लाह ".अशी अल्लाहची उपासना, या रात्रीत करतात. दुआ ( प्रार्थना ) स्वतःच्या भाषेत मागू शकता. अरबी त दुआ वाचन करून अल्लाहशी क्षमा मागत असल्याची भावना आणि जाणीव ठेवतात. 

या शबे कद्र रात्रीत मागवायची प्रार्थना -

"अल्लाहुम्मा इन्नक अफूवून तुहिब्बुल अफवा फअफु अन्नी या गफुरु या गफुरु या गफुरु "

  

कुरआन च्या बोधकथा..4 मूसा अ.

याकूब (Jacob,इस्राइल) अ., युसुफ अ. आणि युसुफ अ. यांचे अकरा भाऊ इजिप्त(मिस्र) मध्ये स्थायिक झाले...आणि फक्त एक अल्लाहची (पालनकर्त्याची) निष्ठा करण्याची शिकवण देत राहिले...त्यांना "बनी इसराइल" म्हणजेच इस्राइलची संतान म्हंटले जात होते..


इजिप्शियन एक अल्लाह मध्ये विश्वास करत नव्हते...त्यामुळे ते, बनी इस्राइलला पसंत करत नव्हते....कारण बनी इस्राइल फक्त एक आणि एक अल्लाह (ईश्वर) ची उपासना करत होते...

इजिप्शियन बनी इस्राइल वर, अन्याय करत होते...त्यांच्याशी वाईट वागत होते...इजिप्शियन खूप शक्तिशाली होते...त्यामुळे गरीब, अत्याचार सहन करणारे, बनी इस्राइल यांना, त्यांच्या क्रूरतेपासून आणि निर्दयतेपासून, खूप कमी संरक्षण मिळायचे...ते त्यांचा आवाज उठवू शकत नव्हते...

त्या काळी, इजिप्तच्या राजाला, फिरौंन (फैरों, Pharo) म्हंटले जायचे...

इजिप्शियन लोकांना ज्योतिष विद्येत, जादू आणि भविष्य कथन यामध्ये खूप विश्वास होता...

एका भविष्य कथन करणाऱ्याने (ज्योतिषी) फिरौंनला सांगितले की एक मुलगा, बनी इस्राइलच्या जमातीत जन्म घेईल, जो त्याचे राज्य कोसळण्यास कारण होईल...

फिरौंन यावर खूप नाराज झाला आणि त्याने आज्ञा दिली की, बनी इस्राइलच्या कोणत्याही कुटुंबात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाला जन्मताच मारून टाकावे...

याच काळात, एक मुलगा, बनी इस्राईल मध्ये जन्माला आले...त्याची आई खूप घाबरली...तिने त्या बाळाचा जन्म गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला. कारण जर राजाच्या कोणत्याही सैनिकांनी त्या बाळाला  शोधले, तर ते लगेच त्याला मारून टाकतील, असे तिला वाटले.

तिने अल्लाह (ईश्वर) कडे प्रार्थना केली आणि अल्लाहने तिला मार्गदर्शन केले की, "एका लाकडाच्या पेटीत त्या बाळाला ठेव आणि ती पेटी नाईल नदीत सोड..." 

तिने अल्लाहवर विश्वास ठेऊन ती आज्ञा पाळली...आणि अल्लाहने तिला वचन दिले की, "तिचा मुलगा सुरक्षित राहील आणि ती पुन्हा लवकरच त्याच्या जवळ जाईल..."

तिने बाळाला एका लाकडाच्या पेटीत ठेवले आणि नदीच्या पाण्यावर तरंगू दिले आणि  तिच्या मोठ्या मुलीला, मरियमला सांगितले की, त्या पेटीकडे नजर ठेव...

ती पेटी राजवाड्याच्या दिशेने वाहत चालली होती आणि मरियम पेटीच्या मागे मागे नदीच्या काठावरून जात होती...जेव्हा पेटी राजवाड्याच्या जवळून जात होती, काही दरबारातील महिलांनी पाहिले की, एक छान आणि गोंडस बाळ, त्याचा अंगठा चोकत आरामात पेटीत खेळत आहे... त्यांनी ते बाळ राणीकडे आणले, जी फिरौंनची पत्नी होती...आसिया...

आसिया त्या बाळाला पाहून खूप आनंदी झाली, कारण तिला स्वतःचे मूल नव्हते...तिने, त्या बाळाला  दत्तक घेण्यासाठी, तिच्या पतीची परवानगी मागितली...पण तिच्या पतीला ही कल्पना आवडली नाही..."हे मूल मला इजा करू शकते, जसे ज्योतिषाने भविष्य कथन केले आहे..." त्याने नकारार्थी उत्तर दिले...

पण आसियाने याचना केली, "या मुलाला मारू नका...तो आपल्यासाठी चांगला ही असू शकेल..."

अनिच्छेने तो मानला...

हे ठरवले गेले की, ते बाळ राजवाड्यात मोठे होईल आणि एक महिला त्याची काळजी घेण्यासाठी आणि त्याला दूध पाजण्यासाठी नियुक्त केली जाईल..जी महिला त्या बाळाला दूध देण्यासाठी नियुक्त केली गेली, बाळाने तिच्याकडून दूध घेतले नाही..आणि रडणे चालूच ठेवले...

मग मरियम (जी बाळाची बहीण होती, पण हे कुणालाही माहीत नव्हते..) पुढे आली आणि म्हणाली, मी तुम्हाला एका महिलेविषयी सांगू शकते, जी खूप चांगली आहे आणि या बाळाला दूध पाजू शकते...

मरियमला, त्या महिलेला बोलावण्यास सांगण्यात आले...ती घरी आली आणि तिच्या आईला तिथे वापस घेऊन गेली...त्या बाळाने लगेच, त्याच्या आईच्या हातात गेल्यावर, रडणे थांबवले...आणि दूध पिणे सुरू केले...

प्रत्येक जण आनंदी झाला...आणि त्या आईला, त्या लहान बाळाची देखभाल करण्याचे आणि दूध पाजण्याचे काम देण्यात आले...(जो की तिचाच मुलगा होता...). 

या बाळाचे नाव होते, मूसा अ.(मोशे, Moses)

मूसा अ. एका राजकुमारासारखे, फिरौंनच्या राजवाड्यात मोठे झाले...ते एक बलवान, सद्गुणी आणि योग्य तरुण बनले...पण ते, जे अवतीभोवती पाहत होते, ते त्यांना आवडत नव्हते...

नेहमी, ते शहरात, त्यांच्या लोकांना भेटायला जायचे आणि पहायचे की, इजिप्तचे लोक, गरीब लोकांशी निर्दयतेने आणि क्रूरपणाने वागायचे. मूसा अ., इजिप्त च्या लोकांच्या, अन्यायाने शिकार झालेल्या लोकांना मदत करायचे...त्यांना क्रूरता आवडायची नाही..त्यांना खूप राग यायचा, जो त्यांना सहन होत नव्हता...

एक दिवस, एका बलवान इजिप्तच्या माणसाने, एका गरीब व्यक्तीला खूप मारले...त्या गरीब व्यक्तीने मदतीसाठी मूसा अ. यांना बोलावले... मूसा अ. खूप रागावले आणि इजिप्तच्या माणसाला त्यांनी, जोऱ्याने मारले...इतक्या जोऱ्यात मारले की, तो माणूस खाली पडला आणि मृत झाला...

आता मूसा अ., जे अनपेक्षितपणे घडले, त्यामुळे घाबरले आणि हताश झाले...त्यांना त्या माणसाचा जीव घ्यायचा नव्हता...असे यामुळे झाले, कारण अन्याय पाहून, त्यांचा राग अनावर झाला...त्यांनी अल्लाहची क्षमायाचना केली...

जेव्हा इजिप्तच्या लोकांना कळले की, मूसा अ. यांनी एका माणसाला मारले आहे, फिरौंनच्या लोकांनी त्यांचा शोध सुरू केला..आणि म्हणून, मूसा अ. यांना इजिप्त सोडावे लागले...

ते एका "मदयन" नावाच्या जागी गेले...

जेव्हा ते तेथे आले, त्यांनी एका विहिरीभोवती खूप लोकं पहिली...ते त्या विहिरीतून पानी काढत होते..आणि त्यांच्या बकऱ्यांना आणि मेंढ्यांना देत होते...

त्या गर्दीपासून, थोड्याच अंतरावर दोन तरुण मुली त्यांच्या  मेंढ्यासोबत उभ्या होत्या आणि शांततेने, त्यांची पाळी संपण्याची वाट पाहत होत्या..ज्यामुळे त्यांची, पाणी काढण्याची पाळी येईल....

"तुम्ही पण तुमच्या हिश्श्याचे पाणी का नाही घेत?" मूसा अ. यांनी विचारले...

"कारण आम्ही इतके धैर्यवान नाही, आम्हाला त्यांचे होईपर्यंत वाट पाहावी लागेल...आमचे पिता, इथे स्वतःहून येण्यासाठी, खूप वृद्ध आणि अशक्त आहेत...त्यामुळे आम्हाला वाट पाहावी लागेल", त्या म्हणाल्या...

एक शक्तिशाली आणि सभ्य तरुण असल्याने आणि ज्यांना न्याय देण्याची खूप चांगली बुध्दी असल्याने, मूसा अ. पुढे झाले, आणि त्यांच्यासाठी पाणी काढले आणि त्यांच्या  मेंढ्यांना दिले....

जेव्हा मुली घरी गेल्या, त्यांनी त्यांच्या पित्याला सांगितले की, कसे एका दयाळू तरुण माणसाने त्यांना मदत केली...त्यांचे पिता एक पवित्र  व्यक्ती होते...एक संदेशवाहक होते..."शोएब अ. "

ते त्यांच्या मुलींना म्हणाले की, "वापस जा आणि त्या तरुणाला घेऊन या..."

जेव्हा दोघींमधील एक मुलगी मूसा अ. यांना बोलावण्यासाठी वापस गेली, ते एका झाडाखाली झोपले होते...थकलेले आणि भुकेले होते..आणि अल्लाहला प्रार्थना करत होते की, मदत कर...

ती त्यांच्याकडे आली आणि म्हणाली की, तिचे पिता, त्यांना भेटण्यासाठी इच्छुक आहेत...

म्हणून मूसा अ. उठले आणि तिच्यासोबत तिच्या घरी गेले...

शोएब अ. यांनी त्यांना छान जेवण दिले आणि मग विचारले की, ते कोण आहे... मूसा अ. यांनी, त्यांना फिरौंन आणि त्यांच्या गरीब लोकांच्या, बनी इस्राईलवरच्या अन्यायाची कहाणी सांगितली...आणि त्यांची स्वतःच्या सुटकेची कहाणी सांगितली..

त्या वृद्ध संदेशवाहकाने त्यांना म्हंटले की, त्यांना काही काळजी करण्याचे कारण नाही..कारण आता ते, एका सुरक्षित जागी, मित्रांत आले आहे...

दोघींपैकी एका मुलीने, तिच्या पित्याला मूसा अ. यांना, एका मेंढपाळाच्या कामावर ठेवण्यास सांगितले .. मेंढ्यांची देखभाल करण्यासाठी कारण ते बलवान, सद्गुणी आणि प्रामाणिक व्यक्ती होते...

त्यांचे पिता मूसा अ. यांना म्हणाले, "जर तुम्ही आमच्यासोबत राहिले आणि आठ ते दहा वर्ष आमच्या मेंढ्याची देखभाल केली, तर मी माझ्या मुलीशी तुमचे लग्न करून देईन..."

मूसा अ. तेथे राहण्यास आणि त्यांच्यासाठी काम करण्यास तयार झाले... तेवढ्या वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर, त्यांनी लग्न करण्याची परवानगी मागितली आणि त्यांच्या पत्नीसोबत, त्यांच्या मेंढ्याच्या कळपाला घेऊन, मदयन सोडले...

इजिप्तला जातांना, मूसा अ. यांनी, एका टेकडीवर एक प्रकाश पहिला...त्यांनी त्यांच्या पत्नीला जोपर्यंत ते तेथून (टेकडीवरून), काही आग घेऊन येत नाही, तोपर्यंत वाट पाहण्यास सांगितले...त्यांनी असाही विचार केला की कोणी, जो त्याला रस्ता दाखवण्यास पात्र आहे, तेथे असेन...

त्यामुळ ते आगीकडे गेले...पण तो काही साधारण प्रकाश नव्हता...तो अल्लाह (ईश्वर) चा प्रकाश होता...

जसे मूसा अ. जवळ गेले, तो प्रकाश दूर आणि आणखी दूर गेला...ते घाबरले आणि तेथून वापस येण्यासाठी फिरले...पण एका आवाजाने त्यांना थांबवले..., "ओ, मूसा..मी तुझा अल्लाह (ईश्वर) आहे...तुझी पादत्राणे काढ...तू एका पवित्र " तोवा"च्या दरीत उभा आहे...मी तुला माझा संदेशवाहक म्हणून निवडले आहे...त्यामुळे तुला जे सांगितले जाईल, नीट काळजीपूर्वक ऐक..."

अशाप्रकारे अल्लाह मूसा अ. यांच्याशी बोलले आणि त्यांना संदेशवाहक बनविले...

मूसा अ. गोंधळलेले होते...अल्लाहने त्यांना विचारले की, "तुझ्या हातात काय आहे?..

"ती माझी काठी आहे", मूसा अ. यांनी उत्तर दिले....

"खाली टाक", आज्ञा आली...

मूसा अ. यांनी आज्ञा पाळली आणि त्यांना आश्चर्य वाटले, ती काठी एक भयंकर साप बनली...

"आता ती काठी उचल आणि घाबरु नको", आज्ञा आली आणि तो साप पुन्हा काठी बनला...

मग मूसा अ. यांना आज्ञा देण्यात आली की, "तुझा हात, तुझ्या भुजेच्या खाली (बगलेत) घेऊन जा...आणि बाहेर काढ...

त्यांच्या हातावरचे, जळल्याचे डाग होतेे, तेे जावून, तो हात चमकू लागला...(मूसा अ. जेव्हा बालक होते, तेव्हा त्यांचा हात पोळला होता...)

हे दोन चमत्कार ( miracles, मोजजे) मूसा अ. यांना देऊन,अल्लाहने आज्ञा केली की, "इजिप्तला वापस जा आणि त्यांच्या 
खऱ्या एक अल्लाह ( ईश्वर) च्या
धर्माचा संदेश, फिरौंनला आणि त्यांच्या तेथील लोकांना दे."

पण मूसा अ. यांना भीती 
वाटत होती की, ते 
इजिप्त  चे लोक त्यांना मारून
टाकतील. कारण त्यांनी, त्यांच्यामधल्या एका इजिप्शियनला मारले होते...अल्लाहने त्यांना आश्वासनं दिले की, ते तसे करणार नाही...

मूसा अ. यांना, शब्द बोलतांना, थोडी अडचण येत होती...ते थोडे अडकून बोलायचे...म्हणून ते अल्लाहला म्हणाले की, त्यांच्या भावाला, हारून अ. यांना सुध्दा, एक संदेशवाहक बनव, त्यामुळे हारून अ., मूसा अ. यांना मदत करतील...

"हे ओझे सहन करण्यासाठी, माझ्या मनाला (हृदयाला) धैर्य दे आणि माझे बोलणे स्पष्ट आणि प्रभावात्मक होऊ दे...जे लोक ऐकतील त्यांच्यासाठी.." मूसा अ. यांनी अल्लाहला प्रार्थना केली...

अल्लाहने त्यांना, त्यांनी जे मागितले सगळे दिले...आणि दोघा भावांना, अल्लाहचा संदेश घेऊन इजिप्तच्या दरबारात जाण्याची आज्ञा केली...

"तुमचा संदेश देतांना दयाळू रहा, कठोर राहू नका"...त्यांना सांगण्यात आले...

अल्लाहच्या मदतीने मूसा अ. बळकट झाले आणि त्यांच्या संदेशवाहक भावासोबत, हारून अ. यांच्यासोबत ते, इजिप्तच्या दरबारात जावून अल्लाहचा संदेश 
सांगण्यासाठी निघाले...

जेव्हा मूसा अ. आणि हारून अ. , 
फक्त एक अल्लाह (ईश्वर) ची श्रद्धा बाळगून, त्याच्यासमोर झुका, हा संदेश, उपदेश, फिरौंन आणि त्याच्या 
लोकांना देण्यासाठी इजिप्त मध्ये आले, 
तेव्हा त्यांना दिसले की, बनी इस्राईल ची जमात, दयनीय अवस्थेत जगत आहेत...
त्यांना  कठोर गुलामी करण्यासाठी 
जबरदस्ती केली जात आहे...

मूसा अ. आणि हारून अ. फिरौंनच्या दरबारात गेले आणि त्यांनी घोषणा केली की, ते त्यांच्या लोकांना, म्हणजे बनी इस्राईलला, इजिप्त पासून दूर घेऊन जाण्यासाठी आले आहेत...त्यांच्या बापदादाच्या धरतीवर....
[जेथून याकूब अ. इजिप्त मध्ये आले होते,आणि जेथे इब्राहीम अ. आणि इसाक अ. यांनी जीवन व्यतीत केले होते..](ही सत्यकथा या पेज च्या आधीच्या भागांत लिहिली आहे..)

फिरौंनने लोकांना घेऊन जाण्यास नकार दिला आणि , म्हणाला, "मूसा, तू माझ्या राजवाड्यात माझ्या मुलासारखा मोठा झाला आहेस? आणि आता तू उपकार विसरून कृतघ्न बनला आहेस...?"

मूसा अ. यांनी उत्तर दिले , "माझ्या अल्लाहने मला मार्गदर्शन केले आहे आणि मला एक संदेशवाहक बनविले आहे...तुम्ही मला लहानाचे मोठे केले, या अशा एक मोठ्या उपकारामुळे, मी माझ्या सर्व लोकांना दुःख सहन करायला लावू का ?

फिरौंनने मूसा अ. यांचे काही ऐकले नाही आणि त्यांच्या संदेशावर वर खूप नाराज झाला, कारण तो स्वतःला अल्लाह (प्रभू) समजत होता...

"तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे, मूसा? कोण आहे तुझा अल्लाह (यहोवा)?" त्याने विचारले...

"माझा अल्लाह हा, तो आहे ...ज्याने हे विश्व बनविले...त्याला भूतकाळाविषयी पूर्ण ज्ञान आहे...त्याने ही धरती, तुझ्या चालण्यासाठी बनविली आणि तोच पाऊस खाली पाठवतो.." मूसा अ. उत्तरले...

"हा हा...", फिरौंन हसला..." , मला माहीत आहे की, माझ्याशिवाय कोणीच प्रभू नाही..." मग तो त्याच्या मंत्र्यांकडे वळला आणि म्हणाला, "हमाम, खूप उंच इमारत बनली का? जेणेकरून मी त्याच्या शिखरावर चढू शकेल आणि मूसाच्या अल्लाहला भेटेन..., नक्कीच तो खोटे बोलत आहे..."

पण मनातून फिरौंनला खात्री नव्हती...त्याने मूसा अ. यांना घाबरविण्याचा प्रयत्न केला.
"मी तुला तुरुंगात टाकेल, मूसा, जर तू म्हणाला की, माझ्याशिवाय दुसरा कोणी प्रभू आहे"..तो म्हणाला. "जर तू बरोबर आहे, तर तू मला काही स्पष्ट निशान्या, तुझे म्हणणे सिध्द करण्यासाठी दाखविल्या पाहिजेत... "

मूसा अ. तयार झाले...अल्लाहने त्यांना, दोन चमत्कार (Miracles, मोजजे)
दाखविण्याच्या शक्ती सोबत आशीर्वाद दिला होता.
त्यांनी त्यांची काठी खाली फेकली आणि ती एका सापात बदलली...मग त्यांनी त्यांचा हाथ त्याच्या काखेत नेला आणि बाहेर काढला...तो प्रखरतेने चमकू लागला...यावर दरबारातील लोक म्हणाले, "हा माणूस नक्कीच जादूगार आहे.." 

फिरौंनने इजिप्तच्या सगळ्या हुशार जादूगारांना, त्यांची जादू मूसा अ. यांना दाखविण्यासाठी बोलावले...

एक दिवस आणि वेळ स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आली आणि  हे मान्य करण्यात आले की, जो स्पर्धेत जिंकेल, तो खरा योग्य आहे, असे मानण्यात येईल...त्या काळी जादूचे खेळ इजिप्त मध्ये खूप प्रसिद्ध होते...त्यामुळे सर्व शहरातून लोक ते पाहण्यासाठी आले...

मूसा अ. यांनी स्पर्धा ठेवण्याबद्दल, फिरौंनचे मन बदलण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले, "आम्ही जादूगार नाही, आम्ही अल्लाहचे  संदेशवाहक आहोत. अल्लाहवर शंका करू नको..तो तुझा नाश करू शकतो..."

पण फिरौंनने निश्चय केला होता की, स्पर्धा ठेवायची...कारण तो त्याच्या जादूगारांवर अगदीं खात्री बाळगून होता...

शेवटी मूसा अ. मानले...," ठीक आहे, यामुळे प्रत्येकासमोर सत्य काय आहे ते सिद्ध होईल..."

जादूगारांनी फिरौंनला विचारले, "जर आम्ही जिंकलो तर तुम्ही पारितोषिक देणार का?"

"नक्कीच", फिरौंन उत्तरला..."मी तुम्हाला उच्च पद ही देईन".

"कोण सुरू करनार?" जादूगारांनी विचारले.."तू का आम्ही ?"

"तुम्ही" मूसा अ. यांनी उत्तर दिले...

जादूगारांनी त्यांच्या सळया आणि काठ्या खाली फेकल्या, ज्या सापांमध्ये बदलल्या...काही क्षणासाठी मूसा अ. यांना चिंता वाटली की, ह्यामुळे ती गर्दी प्रभावित झाली असेल...

पण अल्लाहने त्याला धीर दिला, "काळजी करू नको, मूसा, तू जिंकशील...तुझी काठी फेक"

मूसा अ. यांनी तसे केले...आणि त्यांची काठी एक मोठा सर्प बनून, त्या सापाने त्याच्या आजूबाजूचे सर्व साप गिळून टाकले...प्रत्येक जण आश्चर्यचकित झाला...ह्याने जादूगारांचा पराजय सिद्ध  झाला.. आणि सत्याचा विजय झाला...ह्याने हेही सिद्ध झाले, की मूसा अ. आणि हारून अ. हे अल्लाहचे खरे संदेशवाहक होते...

जेव्हा जादूगारांना ह्याची जाणीव झाली, ते सगळे गुडघ्यावर पडून वाकून नमन करू लागले...आणि म्हणाले, " आम्ही मूसाच्या अल्लाहवर विश्वास करतो. जो खरोखर विश्वाचा निर्माता आहे......

फिरौंन यावर संतापला होता आणि ओरडला, "जर तुमचे धैर्य असेल तर तसे करा. मी तुमचा डावा हाथ आणि उजवा पाय कापून टाकेन आणि तुम्हाला झाडांना अडकवेल.."

"तुला जे आनंद देईल ते तू कर," जादूगारांनी उत्तर दिले...,"पण आता आम्ही सत्य निष्ठा स्वीकार केली आहे...आमचा अल्लाह,
(ईश्वर)आमच्या भूतकाळातील जादू दाखविण्याच्या पापासाठी आम्हाला क्षमा करो, जे तू आमच्याकडून जबरदस्तीने करून घेतले...."

थोड्या संख्येनेे, तरुण व्यक्ती, जेव्हा त्यांनी हे घडलेले पाहिले, मूसा अ. यांच्या धर्माचे अनुयायी बनले...पण ते, त्यांची श्रद्धा उघडपणे जाहीर करण्यास, फिरौंनच्या भीतीमुळे घाबरत होते...

मूसा अ. इजिप्त मध्ये लोकांना उपदेश देत होते...इजिप्त मध्ये एक खूप श्रीमंत माणूस राहत होता "कारून". त्याचा खजिना अगणित होता...त्याने शक्तिशाली माणसे त्याच्या खजिन्याच्या चाव्या सांभाळण्यासाठी ठेवली होती...ते त्या चाव्यांच्या ओझ्याने पार थकून गेले होते...

मूसा अ. नेहमी रस्त्यात आणि शहराच्या चौकात उपदेश द्यायचे...ते त्यांच्या लोकांना आठवण करून द्यायचे की, फक्त एका आणि एकाच अल्लाहची (ईश्वराची) आराधना करा...आणि सांसारिक गोष्टींची काळजी करणे थांबवा...

एकदा त्याचवेळेस "कारून" तेथून जात होता...भव्य रुबाबदार अंगरखा घातलेला त्याचा पोषाख होता  आणि त्याच्या मागे त्याचे सेवक, जे त्याच्या खजिन्याच्या चाव्या सांभाळून होते...चालत होते...

त्याच्या संपत्तीचे आणि सामर्थ्याचे हे प्रदर्शन होते...यामुळे जे तरुण लोक मूसा अ. यांचे ऐकत होते, त्यांचे ध्यान विचलित झाले...

त्यांच्यातले काही, कारूनच्या अवाढव्य संपत्तीला, एक मत्सराने भरलेल्या नजरेने पाहण्यासाठी, अल्लाहच्या संदेशाचे शब्द सोडून, तिकडे वळले...त्यांनी, 
 जीवना नंतर, येणाऱ्या मृत्यू 
नंतरच्या स्वर्गाच्या सुखापेक्षा, अशा संपत्तीची, जी जास्त दिवस राहत नाही, इच्छा केली...

या कारूनच्या संपत्तीच्या आणि सामर्थ्याच्या प्रदर्शनाने मूसा अ. यांचे कार्य अजून कठीण केले... मूसा अ. यांनी कारूनला म्हंटले, "अल्लाहने तुझ्यावर कृपा केली आहे आणि तुला इतकी जास्त संपत्ती दिली आहे...तू गरीबांसाठी दयाळू होऊन, त्यांना दान केले पाहिजे..."

कारून निर्लज्जपणे फुशारकी मारत म्हणाला, "ही माझी संपत्ती आहे, जी मी माझ्या कौशल्याने आणि बुध्दीने मिळविली आहे...तुझ्या अल्लाहने मला दिली नाही...मी का या संपत्तीला दान देऊ? मी मूर्ख नाही, मूसा..."

मूसा अ. खूप नाराज झाले...पण ते काही करू शकत नव्हते...कारून त्याची संपत्ती गरिबांना आणि गरजूंना वाटू इच्छित नव्हता...तो स्वार्थी आणि हट्टी होता...आणि असे मानत होता की, त्याची संपत्ती त्याच्या कष्टांचे फळ आहे...आणि अल्लाहची कृपा नाही...

अल्लाह त्यांना देतो, जो त्याला आनंदी ठेवतो..(गरिबांना दान करून) आणि त्यांच्याकडून घेतो, जो त्याला नाराज करतो...लवकरच लोकांना कळाले की, स्वर्गाचा आणि धरतीचा भव्य खजिना कोण नियंत्रित करतो...

अल्लाहने कारूनला जे पुष्कळ दिले होते, ते त्याच्याकडून घेतले....फुशारकी मारणारा कारून जमिनीत त्याच्या खजिन्याच्यासोबत नष्ट झाला..धसला गेला... त्याचा पैसा त्याच्या किंवा कुणाच्याही, काही कामी आला नाही...

जेव्हा लोकांनी त्याचे भाग्य पाहिले, त्यांना जाणीव झाली की, मूसा अ. बरोबर होते आणि तो गर्विष्ठ आणि फुशारकी मारणारा नाश होणाऱ्यांमध्ये होता....

"फिरौंनला घाबरु नका", मूसा अ. 
त्यांच्या लोकांना म्हणाले,
 " अल्लाह वर निष्ठा ठेवा आणि त्याला मदत मागा..."

मूसा अ. त्यांच्या लोकांना इजिप्तपासून त्यांच्या बापदादांच्या (युसुफ अ. आणि याकूब अ.) जमिनीवर घेऊन जाण्यास इच्छुक होता...पण ते इजिप्शियनचे नोकर (गुलाम) होते, त्यामुळे जाऊ शकत नव्हते...

मूसा अ. यांनी त्याच्याकडून जितके होऊ शकते तितके त्यांना मदत केली आणि मार्ग दर्शन केले...

जेव्हा फिरौंनला मूसा अ. यांचा हेतू समजला, त्याने मूसा अ. यांना आणि बनी इस्राईलचे तरुण लोक, जे मूसा अ. यांच्या धर्माचे अनुयायी बनले होते, त्यांना मारण्याचा निर्णय घेतला...

पण त्याच्या दरबारातील एका दरबाऱ्याला ,जो गुप्तपणे  मूसा अ. यांच्या धर्माचा अनुयायी बनला होता, त्याने फिरौंनला तसे करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला.

"तुम्ही त्याला का मारू इच्छिता?" त्याने विचारले.."फक्त यासाठी का? की, तो असे मानतो की, तुम्ही त्याचे प्रभू नाही..."

मग तो धैर्याने बोलला आणि लोकांना त्या शिक्षेची आठवण करून दिली, जी, त्या लोकांवर येणार आहे, ज्यांनी पूर्वी खऱ्या प्रभूचे अस्तित्व नाकारले आहे...

या त्याच्याविरोधातल्या खुल्या बंडाने, फिरौंन खूप रागावला आणि त्याला सुद्धा, मारण्याची धमकी दिली...

जेव्हा फिरौंनच्या क्रौर्यतेने सगळ्या मर्यादा पार केल्या..,अल्लाह ने मूसा अ. आणि त्याच्या लोकांना आज्ञा केली की, रात्री शांततेने इजिप्त सोडून जा...त्यामुळे मूसा अ., हारून अ. आणि बनी इस्राईलचे लोक शांततेने "कानान" (आताचे पॅलेस्टाईन किंवा फिलिस्तिन) कडे निघाले...जी त्यांच्या बापदादांची जमीन होती...

इजिप्तपासून खूप दूरचा रस्ता होता आणि रस्त्यात नदी होती...(काही म्हणतात तो समुद्र होता).त्यांना दुसऱ्या काठावर जाण्यासाठी, ती नदी पार करायची होती...पण ते तसे करू शकण्याआधी, फिरौंनने शोधून काढले की, त्यांनी सुटका करून घेतली आहे...

तो मोठ्या सैन्यासह तो त्यांच्या मागे गेला...बनी इस्राईलचे लोक, भयंकर घाबरले आणि मूसा अ. कडे वळून म्हणाले, "आता, आपण पकडले गेलो..."

"नाही, कधीही नाही, "मूसा अ. यांनी उत्तर दिले.."अल्लाह (ईश्वर) आपल्या सोबत आहे. 
तो आपल्याला मार्ग दाखवेल..."

या अशा असहाय्यतेच्या वेळी, जेव्हा फिरौंनचे सैन्य मागे होते आणि खोल पाणी समोर होते, त्यांना अल्लाहशिवाय कोणीच मदत करू शकत नव्हते...आणि अल्लाहने मदत केली.

अल्लाहने मूसा अ. यांना आज्ञा केली की, "तुझ्या काठीने पाण्यावर वार कर...". त्यांनी तसे केले आणि लोकांना त्यामधून चालण्यासाठी, मध्ये कोरडा रस्ता बनून, पानी दोन्हींकडे विभागले (दोन भाग झाले..) बनी इस्राईलच्या लोकांनी नदी पार केली आणि सुरक्षितपणे दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचले...

जेव्हा फिरौंनच्या सैन्याने हे पाहिले, ते पाणी पार करण्यासाठी त्याच रस्त्यावरून धावले, जो एका चमत्काराने निर्माण झाला होता...पण जसे ते मध्यभागी पोहोचले, मोठ्या लहरींच्या रूपाने, पाणी वापस आले आणि पूर्ण सैन्य बुडाले....

फिरौंन मरताना ओरडला, "हो, मी विश्वास करतो, बनी इस्राईल ज्याची निष्ठा करतात, तो एकच अल्लाह  (यहोवा, ईश्वर) आहे...दुसरा कोणताही नाही..."

आणि अल्लाह म्हणाला, "तर तू शेवटी मला मानले."  पण, खूप उशीर झाला होता ...

(फिरौंनचे शरीर अजूनही तसेच आहे.... संग्रहालयात ठेवलेले आहे...ज्या पाण्यात तो बुडाला होता तो "रेड सी ( red sea)" आहे, असे मानतात...आणि तिथले पाणी हे खूप खारे असल्याने त्याचे शरीर तसेच राहीले..आणि अल्लाहने कुरआन
मध्ये हे सांगितले आहे की, येणाऱ्या पिढ्यांना ते शरीर पाहता यावे आणि त्याला दिलेली शिक्षेची आठवण व्हावी म्हणून ते शरीर तसेच ठेवण्यात येईल....)

नदी पार केल्यानंतर मूसा अ. आणि बनी इस्राइल चे लोक अशा निर्जन ठिकाणी पोहोचले, जेथे पाणी, झाडे आणि घरे नव्हती....

इस्राइलचे लोक नम्र आणि सौम्य झाले होते...शतकांपासून ते दाबून राहिले होते, त्यामुळे ते धैर्य आणि आत्मविश्वास गमावून बसले होते...

इजिप्त मधून सुटकेनंतर ते थकून गेले होते...ते भुकेले होते आणि घाबरलेले होते...आणि त्यांना मार्गदर्शन, मदत आणि आश्वासन पाहिजे होते...

मूसा अ. आणि हारून अ. यांच्यासाठी हे एक कठीण काम होते...

मूसा अ. आणि हारून अ. यांनी, त्यांना समजावून सांगितले की, जर ते अल्लाहची आज्ञा पाळत राहिले, तर अल्लाह (ईश्वर) निश्चितपणे त्यांची मदत करेल.. फिरौंनच्या हातून अपमानाच्या जीवनापेक्षा, एक 
स्वतंत्र जीवन आणि सत्य श्रद्धा ही कितीतरी चांगली आहे...

इतक्या दिवसापासून, जे लोक दाबून जीवन जगत होते, त्यांनी त्यांचा आत्मविश्वास आणि काही नवीन  करून दाखवायची इच्छा गमावली होती....

त्यांनी तक्रार करण्यास सुरुवात केली, "मूसा, तू आम्हाला कोठे आणले आहे? इथे पाणी नाही...आम्ही काय पिणार आहे? तहानेने आम्ही मरून जावू..."

मूसा अ. यांनी अल्लाहला प्रार्थना केली आणि अल्लाहने त्यांना म्हंटले की, "त्याची काठी, एका खडकावर मार...". मूसाने अ. यांनी तसे केले आणि बारा पाण्याचे झरे (प्रवाह), त्या कोरड्या खडकातून वाहू लागले...जेणेकरून तेथे प्रत्येकासाठी पुष्कळ पाणी झाले...

त्यांनी मूसा अ. यांच्याकडे वळून म्हंटले, "आता आम्हाला पाणी आहे, पण अन्नाविषयी काय? आम्ही भुकेले आहोत...आम्ही काय खाणार? पुन्हा मूसा अ. यांनी अल्लाहला प्रार्थना केली आणि अल्लाहने उत्तर दिले, "काळजी करू नको मूसा, तुम्हाला अन्नही मिळून जाईल".

दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा लोक झोपेतून उठले, त्यांनी झुडूपांवर, काही मऊ आणि पांढरे पाहीले...हे "मन्न" होते...एक प्रकारचे अन्न ज्याचा आकाशातून थेंबासारखा पाऊस झाला होता...त्याची चव गोड होती...

दिवसा, जोऱ्याचा वारा आला आणि त्याच्यासोबत एक खूप मोठा क्वेलस् (लहान पक्षी) चा कळप उडत आला...आणि जमिनीवर सर्वीकडे बसला...लोकांनी त्यांना हातांनी पकडले आणि जेवणासाठी भाजले...हे "सलवा" होते....

त्या दिवसापासून बनी इस्राइलच्या लोकांना रोज मन्न आणि सलवा भेटू लागले...पण अल्लाहने त्यांना दुसऱ्या दिवसासाठी अन्न जमा करून ठेवण्यास मनाही केली...

अल्लाहने त्यांना अन्न आणि पाणी पुरविल्यावर, लोक पुन्हा मूसा अ. यांच्याकडे येऊन म्हणाले, "आम्हाला येथे घरे ही नाही आणि सावली ही नाही, मूसा...आम्ही उन्हाच्या उष्णतेने मरून जाऊ, असे आम्हाला वाटते...

मूसा अ. यांनी अल्लाहला प्रार्थना केली..अल्लाहने उन्हापासून त्यांच्या रक्षणासाठी भारी ढग पाठविले...

लवकरच त्यांचा त्रास कमी होईल, जेव्हा ते त्यांना वचन दिलेल्या, त्यांच्या पूर्वजांच्या जमिनीवर पोहोचतील...आणि हे सर्व एका चांगल्या कारणासाठीच होते की, त्यांनी इजिप्त सोडले, हे  त्या लोकांना समजावणे मूसा अ. यांना कठीण होऊन बसले... मूसा अ. यांनी, अल्लाहच्या मदतीने त्यांच्या आवश्यक गरजा पूर्ण केल्या....

त्यांनी आपसांत वाद आणि भांडण
सुरू केले...

ते म्हणाले, " मूसा मन्न आणि सलवा पुरेसे नाही...आम्हाला कांदा, लसूण, डाळ,आणि हिरव्या भाज्या पाहिजेत...तुझ्या अल्लाहला हे देण्यास सांग"

त्यांच्या कृतघ्नते ने मूसा अ. नाराज झाले, "इतक्या चांगल्या अन्नाऐवजी तुम्हाला या सामान्य वस्तू पाहिजे का? बरं, मग तुम्ही एका शहरात जा आणि तेथे राहा, जेथे तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल..."

लवकरच ते एका शहरापासून जात असताना त्यांनी पाहिले की , लोक दगडाच्या पुतळ्याची आराधना करत होते....ते मूसा अ. यांना म्हणाले की, "मूसा, आमच्यासाठीही अशी प्रतिमा बनव".

मूसा अ. खूप नाराज झाले आणि त्यांना वीट आला. "अरेरे...", ते म्हणाले..., "तुम्ही खरेच अज्ञानी आहात...तुम्हाला अजूनही तुमच्यासाठी, एकाच आणि खऱ्या अल्लाह 
(ईश्वर) च्या  ऐवजी, पुतळे (प्रतिमा)  पाहीजे का?

बनी इस्राइलच्या लोकांनी आग्रह केला... खूप थोडे जे खरंच अल्लाहवर विश्वास करत होते, ते सोडून बाकी सर्व खरंच अज्ञानी आणि खूप कृतघ्न  होते....

अल्लाहने मूसा अ. यांना वचन दिले होते की, जेव्हा त्यांचे लोक इजिप्त सोडतील, त्यांना अल्लाह (ईश्वर) चा कायदा 
( commandmends) देण्यात येईल...
म्हणून इजिप्त सोडल्यानंतर मूसा अ. 
"तूर" या पर्वतावर प्रार्थनेसाठी गेले....त्यांनी त्यांच्या भावाला हारून अ. यांना, जेव्हा ते दूर असतील तेव्हा, त्यांच्या लोकांची काळजी घेण्यास सांगितले...

तेथे मूसा अ. यांनी अल्लाहला चाळीस दिवस पूर्ण भक्तीने प्रार्थना केली. "हे माझे प्रभु....माझ्यासमोर प्रकट हो, जेणेकरून मी तुला पाहू शकेन", त्यांनी प्रार्थना केली....

आणि अल्लाहने उत्तर दिले, "हे तुझ्यासाठी शक्य नाही, की तू मला प्रत्यक्षपने पाहू शकशील...पण जर तू आग्रह करत असशील तर, त्या टेकडीकडे पाहा....जर मला पाहण्यासाठी, तू ते सहन करू शकला, तर तू करू शकतो...". मूसा अ. यांनी  आग्रह केला...

आणि जेव्हा अल्लाह ( ईश्वर) ने त्याची तेजस्विता (प्रकाश,चमक) टेकडीवर
दाखविली, ती टेकडी विखरली आणि मूसा अ. बेशुद्ध होऊन खाली पडले...

जेव्हा ते शुध्दीवर आले, मूसा अ. म्हणाले, "तुझा गौरव असू दे, हे अल्लाह...मी क्षमेची याचना करतो आणि मी तो पहिला विश्वास करणारा आहे..."

अल्लाहने मूसा अ. यांना त्यांचा कायदा दिला आणि त्यांचा ग्रंथ दिला "तौरात 
(तोराह) आणि म्हणाला, 
"मूसा मी तुझ्याशी संभाषण केले...आणि तुला एक प्रेषित (संदेष्टा) म्हणून निवडले....म्हणून मी जे दिले आहे, ते घे आणि कृतज्ञ (आभारी) राहा..ते मजबुतीने पकड...आणि तुझ्या लोकांना त्या खऱ्या श्रद्धेचे अनुसरण करावयास सांग..."

जेव्हा मूसा अ. दूर, तूर डोंगरावर होते, त्यांच्या लोकांनी त्यांच्याविरुद्ध बंड केले...

तेथे त्यांच्यामध्ये एक जादूगार होता.. सामरी...

त्याने त्या लोकांकडून सोन्याचे अलंकार जमा केले आणि त्यांना वितळविले....ते पातळ सोने एका साच्यात ओतले आणि एक सोन्याचे बछडे बनविले. जे आवाज काढू शकत होते....मग त्याने लोकांना त्याची आराधना करण्यास सांगितले....

जेव्हा मूसा अ. तूर डोंगरावरून वापस आले आणि त्यांच्या लोकांना, एका सोन्याच्या बछड्याची आराधना करतांना पाहीले...ते उग्र झाले...त्यांनी त्यांच्या भावाला त्याची दाढी पकडून ओढले...आणि म्हणाले, "मी तुला सांगितले नव्हते का, की त्यांना मार्गदर्शन कर आणि माझ्या अनुपस्थितीत त्यांची काळजी घे? तू ते का केले नाही?"

हारून अ. म्हणाले, "भाऊ, या लोकांसमोर माझ्यावर रागावू नको...अल्लाहला माहीत आहे, की मी त्यांना म्हंटले होते की, ते जे करत आहेत, ते करू नका...जर मी त्यांच्याशी जास्त कठोर नव्हतो, तर ते केवळ या भीतीपायी की ,जेव्हा तू दूर असशील, तेव्हा ते आपसांत भांडतील....आणि तू  वापस आल्यावर माझ्यावर रागावशील..."

मूसा अ. त्यांच्या लोकांकडे वळले आणि म्हणाले, माझ्या लोकांनो, तुम्ही हे का केले? तुम्हाला अल्लाहने त्याच्या कृपेचे वचन दिले नव्हते का? मग का तुम्ही एवढ्या लवकर त्याला विसरला? तुम्हाला स्वतःला मारण्यासाठी, अल्लाहचा प्रकोप पाहीजे आहे का? कारण तुम्ही मला दिलेले तुमचे वचन तोडले...."

त्या सोन्याच्या बछड्याकडे इशारा करत ते म्हणाले, "आणि आता पाहा तुमच्या आराध्याकडे...आपण त्याला आगीत वितळवू आणि त्याचे अवशेष समुद्रात टाकू...एक आणि फक्त एक अल्लाहच्या शिवाय दुसरा कोणताही प्रभु नाही...माझ्या लोकांनो, तुम्ही, एक सोन्याचा बछडा तयार करून आणि त्याची आराधना करून, एक अपराध केला आहे... आता खऱ्या अल्लाहकडे वळा, आणि त्याची क्षमा याचना करा...आणि त्याला असे बलिदान द्या की, तो तुमच्यावर दया करो..."

मूसा अ. यांचे लोक आधी होतेे, तसेच हट्टी होते. त्यांनी, जोपर्यंत ते अल्लाहला त्यांच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकत नाही तोपर्यंत, अल्लाहवर विश्वास ठेवण्यास नकार दिला... मूसा अ. यांनी  सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केला की, ते शक्य नाही, पण त्यांनी आग्रह धरला....

शेवटी, मूसा अ. यांनी, त्यांच्यामधील सत्तर लोकांना निवडले...आणि त्यांना स्वतःसोबत तूर डोंगरावर घेऊन गेले, जेथे त्यांनी अल्लाहशी संभाषण केले होते..पण हेही त्यांना पटवून देण्यात पुरेसे नव्हते...त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी अल्लाहला पाहण्याचा आग्रह धरला...

अल्लाह त्यांच्या हट्टीपणावर रागावला...भयानक वीज चमकली, मेघ गर्जना झाली आणि भूकंप आला...आणि सर्व सत्तर माणसे मृत होऊन खाली पडली...

जेव्हा मूसा अ. यांनी हे पाहीले, त्यांनी अल्लाहला पूर्ण प्रामाणिकतेने याचना केली की, त्यांच्या लोकांना, त्यांच्या अविश्वासाठी क्षमा कर, "हे माझ्या प्रभु, आमच्यावर दया कर...आम्हाला सर्वांना, काही लोकांच्या मूर्खतेमुळे, नष्ट करू नकोस."

अल्लाहने दया दाखविली आणि मृत लोकांना पुन्हा जीवन देऊन, वापस आणले....जेणेकरून ते कृतज्ञ बनतील...ते त्यांचे डोळे चोळत उठले आणि चमत्कार पाहून चकीत झाले...

अल्लाहने म्हंटले, "माझी कृपा त्यांच्यासाठी असेल जे योग्य करतील आणि दान देतील आणि त्यांच्यासाठी असेल जे प्रेषितांना  (संदेशवाहक) ज्यांचे नाव त्यांच्या ग्रंथात , इंजिल (बायबल) आणि तौरात (तोराह) आहे, अनुसरण करतील.....ते असे असतील, ज्यांची भरभराट होईल...

जेव्हा हे सत्तर लोक, त्यांच्या लोकांकडे वापस गेले, त्यांनी त्यांचा अनुभव वर्णन केला आणि म्हणाले, "मूसा खरंच अल्लाहचा एक  संदेशवाहक आहे..."

त्यांनी त्यांना जो वृत्तान्त सांगितला, त्यावर विश्वास करण्यासही सांगितले...पण ते लोक अजूनही शंका करत होते...आणि ऐकण्यासाठी इच्छुक नव्हते....

मूसा अ. यांनी अल्लाहला प्रार्थना केली आणि पुन्हा एकदा अल्लाहने, तूर डोंगर उचलून, त्या लोकांच्या डोक्यावर आणून, त्यांना चमत्कार दाखविला. जेव्हा त्यांनी पाहिले की, तो डोंगर त्यांच्यावर पडणारच आहे, ते घाबरले आणि ओरडले, "आम्ही विश्वास करतो की, मूसा हा अल्लाहचा संदेशवाहक आहे आणि हा तौरात 
(Torah) हा अल्लाह (ईश्वर) चा 
 प्रकट झालेला ग्रंथ आहे...

बनी इस्राइलचे लोक, एक खूप लांब प्रवास करून, "सिना" या ठिकाणी पोहोचले, जे ठिकाण, त्यांना ज्या त्यांच्या पूर्वजांच्या जमिनीचे वचन दिले होती...त्याच्या जवळच होते...

मूसा अ. यांनी त्यांना म्हंटले की, "तुमच्या पूर्वजांच्या शहरात प्रवेश करण्यासाठी आणि तुमची गेलेली जमीन आणि संपत्ती मागण्यासाठी, स्वतःला तयार करा."

मूसा अ. म्हंटले, "धैर्याने, आणि अल्लाहवरच्या कणखर निष्ठेने, जमिनीत प्रवेश करा...जर असे कराल तर , विजय तुमचाच होईल."  त्यांनी असे आश्वासन दिले...

त्या लोकांनी शहरात प्रवेश करण्यास नकार दिला...

मूसा अ. यांनी बारा माणसे निवडली आणि त्यांना त्या शहरातील स्थिती पाहून येण्यास पाठविले...

जेव्हा हे लोक वापस आले, दोन माणसे सोडून बाकी सर्वांनी तेथील शत्रुंच्या सामर्थ्याविषयी भयानक कहाण्या सांगितल्या...लोक अस्वस्थ झाले आणि अशा कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यास नकार दिला... 

"आम्ही येथे बसू आणि वाट पाहू, मूसा.  तू आणि तुझा अल्लाह जावू शकतो आणि शत्रूशी लढू शकतो" , ते म्हणाले... मूसा अ. काहीच मदत करू शकत नव्हते...

मूसा अ. त्यांच्या या वागण्याच्या पद्धतीवर नाराज आणि रागावलेले होते...त्यांनी त्यांचे उरलेले आयुष्य, त्या लोकांना अल्लाहचा संदेश समजून सांगण्याचा प्रयत्न करण्यात खर्च केले... स्वतःची मदत कशी करायची आणि आळशी आणि भांडत राहणे, योग्य नाही, हे शिकवण्यात त्यांची शेवटची
वर्षे गेली...

मूसा अ. यांच्या मृत्युनंतर त्यांचा मित्र आणि अनुयायी "शिस्य" याने, त्याचे कार्य पुढे चालू ठेवले... मूसा अ. यांनी आधी, जे काही सांगितले होते, ते उपदेश त्याने तसेच देने चालू ठेवले...आणि बनी इस्राइलच्या लोकांना, वापस येण्यास आणि त्यांच्या हक्कासाठी लढण्यास खूप प्रेरीत केले...

त्याने लढाई करण्यासाठी, त्या लोकांचे नेतृत्व केले...आणि त्यांना एका मागून एक खूप लढाया करावयास, त्यांचे नेतृत्व करत, घेऊन गेला...जोपर्यंत ते पुन्हा एकदा, त्यांच्या वचन दिलेल्या भूमीच्या दारात पोहोचत नाहीत...

शेवटचा विजय झाल्यावर, अल्लाहने त्यांच्या संदेशवाहकाकडून, त्यांना आदेश दिला की, शहरात विनम्रतेने...अल्लाहला वाकून आभार मानून एक प्रार्थना करत, प्रवेश करा...

त्यांनी या ऐवजी, फुशारकी मारत, त्यांचा विजय साजरा करत प्रवेश केला. त्यांनी, अल्लाहच्या कृपा आणि मदतीसाठी, ज्या अल्लाहने त्यांना, गुलामगिरीतून वाचवून, शांती आणि स्वातंत्र्य दिले, ज्यामुळे त्यांना त्यांचे घर आणि जमीन वापस मिळाली, अल्लाहचे आभार मानत प्रार्थना केली नाही...

त्यांनी, जे शब्द त्यांना प्रवेश करतांना बोलावयास सांगितले होते, ते अल्लाहचे शब्द बदलले आणि त्या शब्दांची थट्टा उडविली...हे त्यांच्या मर्यादापेक्षा अती झाले होते...अल्लाहने या कृतघ्न आणि अवज्ञाकारी लोकांना भयंकर दंड दिला...


🌴🌴🌍मूसा अ. आणि खिझ्र अ.

खीझ्र अ. हे एक ज्ञानी माणूस होते...

जेव्हा मूसा अ. यांनी खिझ्र अ.यांच्या ज्ञानाविषयी ऐकले,  एका सहकाऱ्यासोबत त्यांना शोधण्यासाठी निघाले....आणि जोपर्यंत त्यांना ते भेटत नाही, तोपर्यंत विश्रांती घ्यायची नाही, असा निर्णय घेतला...

जेव्हा ते एका जागी पोहोचले जेथे दोन पाण्याचे प्रवाह (झरे), एका प्रवाहात एकत्र होऊन वाहत होते..., मूसा अ. खूप थकले आणि एका खडकावर गाढ झोपले...

तेथे, मासा जो त्यांनी त्यांच्या दुपारच्या जेवणासाठी आणला होता, जिवंत झाला आणि त्याने पाण्यात उडी मारली...आणि पोहत एक चंदेरी रेषा बनवत दूर गेला.... मूसा अ. यांच्या सहकाऱ्याने हे पाहीले पण याबाबत मूसा अ. यांना सांगण्यास विसरला...

त्यामुळे त्यांनी, जोपर्यंत मूसा अ. यांना भूक लागत नाही आणि ते, सहकाऱ्याला मास्याविषयी विचारत नाही, तोपर्यंत, त्यांचा प्रवास पुढेे तसाच चालू ठेवला.

त्यानंतर, सहकाऱ्याने मूसा अ. यांना जे घडले आहे ते सांगितले... मूसा अ. यांना त्या क्षणी वाटले की, त्यांना
खीझ्रकडे जाण्यासाठी, मार्ग दाखविण्यासाठी तो एक संकेत होता....

म्हणून ते वापस त्या जागी गेले, जेथे ते गाढ झोपले होते...आणि त्यांनाा, एक संतासारखे व्यक्ती त्याच खडकावर बसलेले दिसले...ते खीझ्र अ. होते....

मूसा अ. यांनी, त्यांना अभिवादन केले आणि म्हंटले, "जे अल्लाह खिझ्रच्या द्वारे मूसाला माहीत करवून देणार होते...ते जाणण्यासाठी मी आलो आहे..."

खिझ्र अ. म्हणाले, "अल्लाहने (ईश्वराने)
मला त्याच्या काही रहस्याचे ज्ञान दिले आहे....जे तुला माहीत नाही...तुला ते विचित्र वाटेल आणि त्यामुळे जेव्हा तू माझ्यासोबत असशील, तेव्हा तुला स्वतःला प्रश्न विचारण्यापासून थांबवणे, हे तुझ्यासाठी अवघड होईल..."

पण जेव्हा मूसा अ. यांनी वचन दिले की, ते संयमी राहील. खिझ्र अ. मूसा अ. यांना त्यांच्या सोबत घेऊन जाण्यास आणि शिकण्यास, या अटीवर की ते फक्त लक्ष देऊन पाहतील आणि कोणतेही प्रश्न विचारणार नाही, तयार झाले...

मूसा अ. खिझ्र अ. सोबत गेले...लवकरच ते एका नदीवर आले आणि खिझ्र अ. यांनी नदी पार करण्यासाठी, एक नाव भाड्याने घेतली...नावे वरील लोक खिझ्र अ. यांना ओळखत होते...आणि त्यांना नदी पार करवून देण्यासाठी, त्यांनी कोणतेही शुल्क घेतले नाही...

जेव्हा ते नदी पार करत होते, खिझ्र अ. यांनी, एक फळी तोडून, नावेत एक छिद्र केले.....हे जास्त विचित्र होते... मूसा अ. यावर नाराज झाले...आणि खिझ्र अ. यांना  म्हणाले, "या अशाप्रकारे, त्यांच्या दयाळुतेची तुम्ही भरपाई करणार आहात का? तुम्ही ते का केले?"

"मी तुला म्हटले नव्हते का, की कोणताही प्रश्न विचारायचा नाही?", खिझ्र अ. बोलले....

त्याच वेळेस एक पक्षी आला आणि नौकेच्या पुढच्या निमुळत्या भागावर बसला आणि एक थेंब पाणी पिला...तिकडे इशारा करून खिझ्र अ. म्हणाले, " अल्लाहच्या ज्ञानाशी तुलना करतांना, जे एका महासागरासारखे आहे, आपले ज्ञान त्या एका थेंबासारखे आहे..."

मूसा अ. यांना त्यांची चूक कळली, वचनाची आठवण करून, त्यांनी माफी मागितली, "मी पुढच्या वेळेस जास्त सावध राहील", ते म्हणाले.....

जेव्हा ते नदीच्या पलीकडे, शहरात पोहोचले आणि ते त्या शहरातून जात असताना, त्यांनी एका मुलाला पाहिले...काहीच खास कारण नसतांना खिझ्र अ. यांनी त्या मुलाला मारले.....

हे मूसा अ. यांच्यासाठी सहन करने खूप कठीण होते....ते त्यांचे वचन विसरले आणि त्यांनी रागाने विचारले, "त्या निरागस मुलाला तुम्ही का मारले?"

खिझ्र अ. यांनी काहीच उत्तर दिले नाही....त्यांनी फक्त मूसा अ. यांना त्यांच्या वाचनाची आठवण करून दिली...आणि म्हणाले, "जर तू पुन्हा एकदा तुझे वचन तोडले तर मी तुला सोडून जाईल"

मूसा अ. यांनी माफी मागितली...आणि वचन दिले की, पुन्हा प्रश्न विचारणार नाही...

लवकरच ते दुसऱ्या शहरात पोहोचले जेथे, कुणालाही आश्रय देण्यास नाखूष असे लोक होते....त्यांनी मूसा अ. आणि खिझ्र अ., या प्रवाश्यांना कोणतेही अन्न आणि निवारा दिला नाही...

खिझ्र अ. एका भिंतीजवळ आले, जी अगदी कोसळणारच होती... खिझ्र अ. यांनी ती भिंत, कामाचे काहीही पैसे न घेता दुरुस्त केली....

मूसा अ. यांना, ही निर्दयपनाच्या बदले, दयाळूता कळाली नाही....ते स्वतःला विचारण्यापासून थांबवू शकले नाही, "जर ते लोक आपल्याशी इतके निर्दयी राहिले, तर तुम्ही हे का केले? कमीत कमी त्यामुळे काही अन्न विकत घेण्यासाठी, तुम्ही काही पैसे घेऊ शकत होता"

"अरेरे", खिझ्र अ. म्हणाले, "तू संयम ठेऊ शकला नाही...आपण वेगळे होण्याची ही वेळ आहे...पण मी तुला सांगतो की मी का केले आणि मी काय केले"

"ती नाव ज्या मध्ये मी छिद्र पाडले, ती गरीब लोकांची होती, ज्यांनी त्यापासून त्यांच्या जीवनाचा उदरनिर्वाह मिळवला... नदीच्या पलीकडे राहणारा राजा खूप क्रूर आहे आणि सगळी चांगली चालणारी नावे जबरदस्तीने घेऊन टाकतो....त्याने ती नाव ही घेतली असती...म्हणून मी त्यात छिद्र पाडले..."

"पण तुम्ही त्या मुलाला का मारले?" मूसा अ. यांनी विचारले...

"मी त्याला मारले कारण त्याचे माता पिता खूप साधे आणि सद्गुणी लोक आहेत," खिझ्र अ. म्हणाले,      "पण तो एक खूप दुष्ट व्यक्ती म्हणून मोठा होणार होता...आणि त्यांचे जीवन दयनीय करणार होता....यामुळे ते नाराज झाले असतील पण या वेदना आणि दुःख खूप कमी आहे, त्यापेक्षा जेव्हा तो मोठा होऊन एक पापी बनला असता आणि तेव्हा त्यांना जे सहन करावे लागले असते....अल्लाह लवकरच त्यांना दुसरा मुलगा देईल जो त्यांच्या वृद्धापकाळात एक आनंद देईल"

"शेवटच्या कृत्य काय होते? तुम्ही ती भिंत का नीट केली, त्या लोकांनी आपल्याला इतका निर्दयपना दाखवूनही," मूसा अ. म्हणाले....

"बरं, मी तसे केले कारण त्या भिंतीखाली, दोन अनाथ मुलांच्या मालकीचा खजिना लपलेला आहे..." खिझ्र अ. म्हणाले, "त्यांचे पिता खूप सद्गुणी मनुष्य होते...आणि ही अल्लाहची इच्छा आहे की, जेव्हा ही मुले मोठी होतील, तेव्हा खजिना शोधून काढतील..."

मूसा अ. समोर हे सर्व स्पष्ट केल्यानंतर खिझ्र म्हणाले, " लक्षात घे, मी स्वतःहून काहीही केलेले नाही, ही सर्व अल्लाहची इच्छा होती..."

मग खिझ्र अ. मुसा अ. यांना, आश्चर्यचकित सोडून निघून गेले...आणि ते, या विचारांत हरवून गेले, की अल्लाहच्या रहस्यांविषयी मनुष्याला किती कमी माहीत आहे...खरंच प्रत्येक गोष्टीला कारण आहे आणि एकट्या अल्लाहला सर्व माहीत आहे...

08. मूसा अ. आणि फिरौंन

मूसा अ. आणि फिरौंन  (*या सत्य कथे युसुफ अ. ची सत्यकथा वाचावी.) इजिप्तचे लोक, एक अल्लाह मध्ये विश्वास करत नव्हते…त्यामुळे ते, बनी इस्राइल च्...